
नवी दिल्ली : भारताने बुधवारी पाकिस्तान उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले. भारताने पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्याला देशातून बाहेर काढण्याची ही गेल्या १० दिवसांतील दुसरी वेळ आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत सरकारने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला ‘पर्सोना नॉन ग्राटा’ म्हणून घोषित केले आहे, कारण तो त्याच्या पदनामानुसार काम करत नव्हता. "भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारतातील त्याच्या अधिकृत दर्जाशी जुळत नसलेल्या कारवाया केल्याबद्दल अयोग्य व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. त्या अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे."
सरकारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, या संदर्भात पाकिस्तान उच्चायोगाला आक्षेप पत्र जारी करण्यात आले आहे आणि भारतातील कोणत्याही पाकिस्तानी राजदूताने किंवा अधिकाऱ्याने त्यांना दिलेल्या अधिकारांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
याआधीही भारतविरोधी कारवायांमुळे आणखी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला देशातून हाकलून लावण्यात आले होते. १३ मे रोजी, भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला त्याच्या राजनैतिक दर्जाशी विसंगत असलेल्या क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्याचे घोषित करून हद्दपार केले होते.