
भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्व विमानतळांवर आणि उड्डाणांवर तातडीने ‘सर्वोच्च स्तराची सुरक्षा’ लागू केली आहे. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) ने गुरुवारी नवीन आदेश जारी करत सर्व प्रवाशांसाठी 'प्री-बोर्डिंग' तपासणी अनिवार्य केली. तसेच, टर्मिनल इमारतीत व्हिजिटर एंट्री पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
का वाढवली सुरक्षा?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण सुरक्षास्थितीच्या पार्श्वभूमीवर, देशातील सर्व नागरी विमान वाहतूक स्थळांवर, विमानतळ, हवाई पट्ट्या, हवाई क्षेत्र, एअरफोर्स स्टेशन, हेलिपॅड्स, फ्लायिंग स्कूल्स, विमानतळ प्रशिक्षण संस्था येथे सुरक्षेची पातळी वाढवणे अत्यावश्यक झालं आहे, असं सरकारच्या आदेशात म्हटलं आहे. "देशात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्व संबंधित घटकांनी कमाल दक्षता बाळगावी," असा स्पष्ट इशारा आदेशात देण्यात आला आहे. विमानात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती वा वस्तूची तपासणी सर्वोच्च स्तरावर करावी असेही सांगण्यात आले आहे. तसेच, अनुसूचित नसलेल्या विमान उड्डाणांवर (यामध्ये एअर ॲम्ब्युलन्सही समाविष्ट आहे) कडक देखरेख ठेवण्याचे व कार्गो आणि जनरल एव्हिएशन टर्मिनल्सवर सुरक्षेची पातळी वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुरक्षेचे कडक आदेश काय आहेत?
प्रत्येक प्रवाशाला बोर्डिंगपूर्वी दुसरी तपासणी (Secondary ladder point check) आवश्यक
टर्मिनल इमारतीत 'व्हिजिटर एंट्री' पूर्णतः बंद
विमानतळ संचालकांना सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याची खात्री करण्याचे आदेश
प्रवाशांचे आणि कर्मचाऱ्यांचे वैध ID कार्ड तपासणे बंधनकारक
प्रवाशांच्या सामानाची व्यवस्थित तपासणी
प्रवेशद्वारांवर वाहने आणि व्यक्तींची कडक तपासणी
PNR, प्रवासी यादी आणि मालवाहतुकीच्या नोंदींची काटेकोर तपासणी
ड्रोन, पॅरा-ग्लायडर, मायक्रोलाइट विमाने, एअर मॉडेल्सवर कठोर नजर
एअरफोर्स स्टेशन, हेलिपॅड्स, फ्लायिंग स्कूल्स, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स यांनाही उच्चस्तरीय सुरक्षा
कार्गो आणि जनरल एव्हिएशन टर्मिनल्सवर कडक देखरेख
प्रत्येक विमानात प्रवेश करणाऱ्या व्यक्ती व वस्तूंवर बारीक लक्ष
अनुसूचित नसलेल्या फ्लाइट्सवर विशेष लक्ष