
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दिली. संसदेचे अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान घेण्यात येणार असून या कालावधीत ‘ऑपरेशन सिंदूर’वरही चर्चा होणार आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अनुषंगाने विशेष सत्र घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, विशेष सत्र घेण्याबाबत केंद्र सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भातील तारखांबाबत निर्णय घेतल्याचे रिजिजू यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. अद्यापही भारत आणि पाकिस्तानमध्ये काही प्रमाणात तणावाचे वातावरण असल्याचे सांगितले जाते.
विशेष अधिवेशनाची विरोधकांची मागणी
या पार्श्वभूमीवरून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अनुषंगाने विशेष सत्र घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, विशेष सत्र घेण्याबाबत केंद्र सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. अधिवेशनादरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे संकेत रिजिजू यांनी दिले.
सरकारने काढला पळ - काँग्रेस
पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम ४७ दिवस अगोदर जाहीर करून सरकार विशेष अधिवेशनाला सामोरे जाण्यापासून पळ काढल्याची टीका काँग्रेसने केली आहे.