
नवी दिल्ली : जगातील कोणतीही ताकद काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळे करू शकत नाही, अशी वल्गना करणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग आहे, तो पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानला कोणत्याही किंमतीत ‘पीओके’ रिक्त करावाच लागेल, असे भारताने पाकिस्तानला खडसावले आहे.
काश्मीर आमची मुख्य धमनी होती, आहे आणि राहील. आम्ही ती विसरणार नाही. जगातील कोणतीही ताकद काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळे करू शकत नाही, अशी वल्गना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केली. त्याला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तान लष्करप्रमुखांच्या काश्मीर आणि द्विराष्ट्र सिद्धांतावरील विधानावर प्रतिक्रिया देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली होती. मात्र, बांगलादेशची स्थापना होताच हा सिद्धांत अयशस्वी ठरला. जम्मू-काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे. पाकिस्तानने बेकायदेशीररित्या कब्जा केलेला भाग (पाकव्याप्त काश्मीर) भारताला परत द्यावा लागणार आहे.