जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

२०२३ मध्ये जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की कमी वजन, कमी उंची व कुपोषण ही या मृत्यूंमागील प्रमुख कारणे असल्याचे नव्या अभ्यासात नमूद केले आहे. भारतात अशा प्रकारच्या १ लाखांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.
प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : २०२३ मध्ये जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की कमी वजन, कमी उंची व कुपोषण ही या मृत्यूंमागील प्रमुख कारणे असल्याचे नव्या अभ्यासात नमूद केले आहे. भारतात अशा प्रकारच्या १ लाखांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.

नायजेरियात बालवाढ अपयशाशी संबंधित १.९९ लाख बालमृत्यू नोंदले गेले असून ते जगात सर्वाधिक आहेत. त्याखालोखाल भारताचा दुसरा क्रमांक आहे. त्याखालोखाल तिसऱ्या क्रमांकावर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोचा क्रमांक लागतो, जिथे पन्नास हजाराहून अधिक मृत्यू नोंदले गेले असल्याचे ‘द लॅन्सेट चाइल्ड अँड अडोलेसेंट हेल्थ’ जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षांमधून समोर आले आहे.

वयानुरुप मुलांची वाढ न झाल्यास मुलांमध्ये मृत्यू आणि अपंगत्वाचा धोका अधिक वाढतो. श्वसनसंस्थेचे संसर्ग, अतिसार, मलेरिया आणि गोवर यांसारख्या आजारांमध्ये हा धोका अधिक असल्याचे संशोधकांनी सांगितले.

या विश्लेषणासाठी २०२३ मधील ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीमधील डेटा वापरण्यात आला असून, जगातील २०४ देश आणि प्रदेशांमधील आजार, जखमा आणि विविध जोखमींमुळे झालेल्या आरोग्यहानीचे हे सर्वात अलीकडील मूल्यांकन आहे.

जागतिक स्तरावर, बालवाढीस प्रभावित करणाऱ्या घटकांमुळे होणारे मृत्यू २००० मधील २७.५ लाखांवरून २०२३ मध्ये ८ लाखांपर्यंत घटले आहेत. तरीही, आफ्रिका आणि दक्षिण आशियात अद्याप मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल आरोग्यपरिणाम दिसून येत आहेत. आफ्रिकेत सहा लाखांहून अधिक तर दक्षिण आशियात १.६५ लाखांहून अधिक बालमृत्यू झाल्याचे संशोधकांनी नमूद केले.

“बालवाढ अपयशाला कारणीभूत घटक गुंतागुंतीचे आणि एकत्रित स्वरूपाचे असतात-अपुरे पोषण, अन्नसुरक्षेचा अभाव, हवामान बदल, स्वच्छतेची कमतरता किंवा युद्ध,” असे ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी’चे सह-लेखक आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील प्रोफेसर बोबी रेनर यांनी सांगितले. “म्हणूनच सर्व प्रदेशांमध्ये लागू होईल अशी एकच रणनीती या समस्येवर उपाय ठरू शकत नाही,” ते पुढे म्हणाले.

या वयोगटातील १२ टक्के मृत्यूंमागे कमी वजन हे प्रमुख कारण होते, तर ९ टक्के क्षीण वाढ आणि ८ टक्के कमी उंची या कारणांमुळे मृत्यू झाले.

दक्षिण आशियात आढळलेल्या आतड्यांच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ७९ टक्के, आणि श्वसन संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ५३ टक्के प्रकरणे ‘चाइल्ड ग्रोथ फेल्युअर’शी जोडलेली होती. दक्षिण आशियातील उच्च-आर्थिक स्तराच्या प्रदेशात अशा मृत्यूंचे प्रमाण सर्वात कमी नोंदले गेले-दोन्ही प्रमुख कारणांमध्ये अनुक्रमे सुमारे ३३ टक्के आणि ३५ टक्के. कमी उंचीची चिन्हे जन्मानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांतच दिसतात, यावरून गर्भधारणेआधी आणि गर्भावस्थेत हस्तक्षेपांची गरज अधोरेखित होते, असे संशोधकांनी सांगितले.

क्षीण वाढ आणि कमी उंची यांचा परस्परांशी संबंध आहे. अपुरी शारीरिक वाढ भविष्यातील क्षीण वाढीचा धोका वाढवते. जन्मानंतरच्या पहिल्या काही महिन्यांत दिसणारे वाढीचे अपयश अनेकदा कमी वजनाने किंवा अकाली जन्मलेल्या बाळांचे सूचक असते. तर वयानुसार मोठ्या बालकांमध्ये हे अपुरे पोषण, पुनरावृत्ती होणारे संसर्ग किंवा इतर कारणांकडे निर्देश करते, असे संशोधकांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in