

नवी दिल्ली : अंतराळ क्षेत्रात मोदी सरकार आक्रमकपणे खासगीकरणाचे धोरण राबवत असल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर भाजपने सोमवारी त्याला प्रत्युत्तर दिले. भारताचा अंतराळ कार्यक्रम हा आता इस्रो, खासगी उद्योग आणि शेकडो स्टार्टअप्सच्या एकत्रित सहकार्याने पुढे जात आहे असा दावा भाजपने केला.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर अंतराळ क्षेत्रात ‘आक्रमक खासगीकरणाचा अजेंडा’ राबविण्याचा आरोप केला होता. तसेच अणुऊर्जा क्षेत्राप्रमाणेच अंतराळ कार्यक्रमालाही सरकार ‘कमकुवत आणि निष्प्रभ’ करत असल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेस नेत्याच्या आरोपांना उत्तर देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राष्ट्रीय माध्यम सहप्रभारी प्रदीप भंडारी यांनी सांगितले की, अंतराळ क्षेत्र खुले केल्यामुळे खासगी कंपन्या आणि स्टार्टअप्स केवळ पुरवठादार न राहता रॉकेट, उपग्रह आणि संपूर्ण अंतराळ प्रणाली विकसित करणारे घटक बनले आहेत. इस्रोने प्रक्षेपित केलेल्या परदेशी उपग्रहांची संख्या २०१४ पूर्वीच्या ३५ वरून जानेवारी २०२६ पर्यंत ३९९ झाली आहे, असा दाखला त्यांनी दिला.