
कोविड-१९ महामारीच्या प्रभावातून भारताची अर्थव्यवस्था सावरत आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक मापदंडाने आणि व्यवहारांनी कोरोनापूर्व पातळी ओलांडली आहे. त्यामुळे भारत २०२७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश बनेल, असा दावा देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) अनंत नागेश्वरन यांनी केला आहे.
नागेश्वरन शनिवारी हरियाणातील गुरुग्राम येथे हरियाणा इन्िस्टट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये 'भारतीय अर्थव्यवस्था: प्रॉस्पेक्टस, चॅलेंज आणि अॅक्शन पॉइंट' या विषयावर बोलत होते.
ते म्हणाले की, कोरोनापासून सावरण्यासाठी सरकारने धोरणात्मक पातळीवर अनेक सकारात्मक पावले उचलली, ज्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने पूर्ण पाठिंबा दिला. मुख्य सल्लागार म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था जगातील इतर विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत सर्वच बाबतीत मजबूत आहे. ते म्हणाले की, विकसित जग कमी चलनवाढीकडून उच्च चलनवाढीकडे वाटचाल करत आहे आणि अशा वेळी आपण महागाईचा दबाव नियंत्रणात ठेवू शकलो आहोत. सीईए यांनी आशा व्यक्त केली की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या अंदाजानुसार, भारत २०२७पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश बनेल. आज आपल्याकडे खाजगी गुंतवणुकीचे जोरदार पुनरागमन होत आहे आणि देशाने लक्ष्य ठेवले होते, तेवढा परकीय चलन साठा आहे. गेल्या काही वर्षांत भारतात डिजिटल पेमेंटच्या संख्येत झालेली वाढ हे देश झपाट्याने बदलत असल्याचे द्योतक आहे.