

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे वाढलेल्या इंधन व नैसर्गिक वायूच्या दराने देशात घाऊक महागाईचा भडका उडाला आहे. मार्च २०२६ मध्ये घाऊक महागाईचा दर ३.८८ टक्के होता तो एप्रिलमध्ये ८.३ टक्क्यांवर पोहचला आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचे आणखीन हाल होणार आहेत.
युद्धामुळे इंधन दरवाढ झाल्याने घाऊक महागाईने ४२ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. एप्रिलमध्ये घाऊक महागाईचा दर ८.३ टक्क्यांवर पोहोचला असून, मार्चमध्ये हा दर ३.८८ टक्के होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घाऊक महागाईचा दर केवळ ०.८५ टक्के नोंदवला होता. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे ही स्थिती ओढवल्याचे ‘बार्कलेज’ या जागतिक ब्रोकरेज संस्थेने म्हटले आहे.
इंधन आणि ऊर्जा गटातील महागाई मार्चमधील १.०५ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये थेट २४.७१ टक्क्यांवर पोहोचली. कच्च्या तेलाच्या बाबतीत हा दर ८८.०६ टक्के असून ऑक्टोबर २०२१ नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. पश्चिम आशियातील युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. खनिज तेले, नैसर्गिक वायू आणि धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाई वाढल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अन्नपदार्थांची महागाई मार्चमधील १.९० वरून एप्रिलमध्ये १.९८ टक्क्यांवर पोहोचली आहे. बिगर अन्नपदार्थांच्या बाबतीत हा दर १२.१८ टक्के नोंदवला आहे. एलपीजीच्या महागाई दरात मोठी वाढ झाली असून मार्चमधील उणे १.५४ टक्क्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये हा दर १०.९२ टक्क्यांवर गेला आहे. पेट्रोलची महागाई ३२.४० टक्के आणि डिझेलची महागाई २५.१९ टक्के वाढली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या असल्या तरी सरकारने घरगुती वापरासाठीचे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर ठेवले आहेत. मात्र, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.