
नवी दिल्ली : भारतातील तरुणांच्या मदतीने देश २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
‘विकसित भारत तरुण नेता संवाद २०२५’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, माहितीच्या विश्लेषण करणाऱ्या लोकांना हे कदाचित अशक्य वाटेल. पण, लक्ष्य हे मोठे असेल परंतू अशक्य नाही. आपला प्रत्येक निर्णय, पाऊल हे ‘विकसित भारता’चे विचार करतील, तर जगातील कोणतीही ताकद आपल्याला रोखू शकत नाही. या ‘भारत मंडपम’मध्ये जागतिक नेते जगाच्या भविष्यावर चर्चा करत होते. आज भारताचे तरुण येत्या २५ वर्षांचा आराखडा तयार करत आहेत, असे मोदी म्हणाले.
काही महिन्यांपूर्वी तरुण खेळाडूंना माझ्या निवासस्थानी भेटलो. त्यातील एकाने मला सांगितले की, मोदीजी तुम्ही जगासाठी पंतप्रधान असाल. मात्र, आमच्यासाठी पंतप्रधानांचा अर्थ ‘परममित्र’ असा आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे. या विश्वासातूनच भारतातील तरुणांच्या ताकदीने भारत लवकरच विकसित राष्ट्र बनेल, असे ते म्हणाले. पुढील दशकात भारताने ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यादृष्टीने पूर्ण ध्येयनिश्चितीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच भारताने २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्यही आम्ही निश्चित गाठू, असे ते म्हणाले.