कोणाचीही गय करणार नाही! गृहमंत्री अमित शहा यांचा स्पष्ट इशारा

पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांची हत्या करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी स्पष्ट इशारा दिला. हल्ल्यानंतर पहिल्यांदाच शहा यांनी सार्वजनिक व्यासपीठावार याबाबत भाष्य केले.
अमित शहा
अमित शहा संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांची हत्या करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी स्पष्ट इशारा दिला. हल्ल्यानंतर पहिल्यांदाच शहा यांनी सार्वजनिक व्यासपीठावार याबाबत भाष्य केले. गृहमंत्र्यांनी यावेळी सूड घेण्याची शपथ घेतली. हे नरेंद्र मोदी सरकार आहे. त्यामुळे कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा गृहमंत्र्यांनी यावेळी दिला.

तुम्ही युद्ध जिंकले आहे असे समजू नका, दहशतवाद्यांनी असे समजू नये की त्यांनी २६ लोकांना मारल्यानंतर युद्ध जिंकले आहे, लढाई अजून बाकी आहे, असा इशारा शहा यांनी दिला. बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी उभारण्यात आलेल्या रस्त्याच्या आणि पुतळ्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

“दहशतवादाला आम्ही सडेतोडपणे उत्तर दिले आहे. जर कोणी भ्याड हल्ला करून हा आपला मोठा विजय आहे असे समजत असेल, तर एक गोष्ट समजून घ्या, हे नरेंद्र मोदी सरकार आहे, कोणालाही सोडणार नाही. देशाच्या प्रत्येक इंच जमिनीवरून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होणारच, असेही शहा म्हणाले.

या लढाईत केवळ १४० कोटी भारतीयच नाही तर संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे. जगातील सर्व देश एकत्र आले आहेत आणि दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतीय जनतेसोबत आहेत. मी पुन्हा एकदा हे सांगू इच्छितो की, जोपर्यंत दहशतवादाचा समूळ नाश होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील आणि ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना योग्य ती शिक्षा नक्कीच दिली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानकडून असीम मलिक यांची ‘एनएसए’ म्हणून नियुक्ती

पहलगाम हल्ल्यानंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने ‘आयएसआय’ प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती ३० एप्रिल रोजी मध्यरात्री जाहीर करण्यात आली. असीम मलिक यांना सप्टेंबर २०२४ मध्ये ‘आयएसआय’ प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते. एप्रिल २०२२ मध्ये मोईद युसूफपासून पाकिस्तानकडे ‘एनएसए’पदी कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. या नियुक्तीनंतर, असीम मलिककडे आता दोन जबाबदाऱ्या असतील.

पाकला समुद्रमार्गे हल्ल्याची भीती

पहलगाम हल्ल्यानंतर हल्ल्याच्या भीतीने पाकने ग्वादर बंदराची सुरक्षा वाढवली आहे. कराची हवाई तळावर २५ चीननिर्मित जे १० सी आणि जेएफ १७ लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ही विमाने हल्ल्याच्या स्थितीत काही मिनिटांत ग्वादर बंदरावर पोहोचू शकतात. पाकला भारत समुद्रमार्गे मोठा हल्ला करण्याची भीती वाटत आहे.

हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ

पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि लष्कराने हाफिज सईदची सुरक्षा वाढवली आहे. हाफिज सईद हा ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जमात-उद-दावा’ यासारख्या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. भारताकडून गुप्त कारवाईत सईदला लक्ष्य केले जाण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात येत आहे.

अब की बार घर में घुसके बैठ जाना है - असदुद्दीन ओवैसी

‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानविरोधात ठोस कृती करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले. “भाजपकडून घर में घुस के मारेंगे असे नेहमी सांगितले जाते. पण यावेळी या विधानाच्या पलीकडे जाऊन आपल्याला ‘घर में घुस के बैठ जाना है’ असे म्हणायला हवे”, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in