
श्रीनगर : दहशतवादी नेटवर्कविरोधात सैन्याने कठोर पाऊल उचलले आहे. त्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणि पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेला दहशतवादी आसिफ शेखचे घर बॉम्बने उडवण्यात आले आहे, तर दुसऱ्या दहशतवाद्याचे घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
आसिफ ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी होता. सुरक्षा जवानांनी त्रालमध्ये ही कारवाई केली.
दरम्यान, बंदीपोरा भागात नाका तपासणीदरम्यान पोलिसांनी मोहम्मद रफिक खांडे आणि मुख्तार अहमद डार यांना पकडले. त्यांच्याकडून बेकायदेशीर शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. जेव्हा पोलिसांनी भारतीय सैन्यासह नाकाबंदी केली तेव्हा त्यांनी रईस अहमद डार आणि मोहम्मद शफी डार यांना अटक केली. त्यांच्याकडून हँड ग्रेनेड, ७.६२ मिमी मॅगझिन आणि ७.६२ मिमीचे ३० राऊंड जप्त करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये अद्यापही ५८ दहशतवादी सक्रिय
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल ५८ दहशतवादी सक्रिय आहेत. यातील बहुतांश दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’चे आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आली.
नियंत्रणरेषेवर पाककडून रात्रभर गोळीबार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर तणाव वाढला असून हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पाकिस्तानी सैन्याने रात्रभर नियंत्रणरेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार केला. पण या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारताच्या बाजूने कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. फेब्रुवारी महिन्यातदेखील पाकिस्तानी सैन्याने पूंछ जिल्ह्यातील एलओसीवर भारतीय चौकीवर छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला होता. त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते.