नवी दिल्ली : भारतीय सैन्यात सध्या मोठ्या प्रमाणात सैनिकांची कमतरता असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, लष्कराने अग्निवीरांची भरती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, ४५,००० ते ५०,००० सैनिकांची भरती केली जाते, ही वार्षिक भरती १,००,००० पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
२०२२ मध्ये अग्निवीर योजनेद्वारे कमी संख्येने सैनिकांची भरती सुरू झाली असली तरी, निवृत्त होणाऱ्या सैनिकांची संख्या दरवर्षी ६० ते ६५ हजार इतकी राहिली, यामुळे दरवर्षी एकूण २० ते २५ हजार सैनिकांची कमतरता वाढत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी दरवर्षी एक लाख अग्निवीरांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२०-२१ मध्ये जेव्हा कोविड-१९ साथीचा आजार आला तेव्हा सैन्याने भरती थांबवली. या दोन वर्षांत अंदाजे १ लाख २० हजार ते एक लाख ३० हजार सैनिक निवृत्त झाले. हे २०२२ मध्ये अग्निवीर योजना सुरू होण्यापूर्वीचे होते. त्यामुळे निवृत्तीमुळे झालेली पोकळी भरून काढता आली नव्हती.
अंदाजे १.८ लाख सैनिकांची कमतरता
ज्यावेळी अग्निवीर योजना सुरू करण्यात येणार होती. त्यावेळी पुढील चार वर्षांत सैन्यात अग्निवीरांची भरती हळूहळू वाढवण्याचे नियोजन होते. याची मर्यादा १.७५ लाख होती. नौदल आणि हवाई दलातील भरतीची आकडेवारीही पुढील चार वर्षांत हळूहळू अंदाजे २८,७०० पर्यंत वाढवायची होती. अग्निवीर योजनेत २०२२ मध्ये कमी संख्येने सैनिकांची भरती सुरू झाली. मात्र, निवृत्त होणाऱ्या सैनिकांची संख्या दरवर्षी ६० ते ६५ हजार इतकीच राहिली. त्यामुळे सध्या, सैनिकांची एकूण कमतरता अंदाजे १.८ लाख इतकी आहे.