
नवी दिल्ली : येत्या काळात स्वदेशी रॉकेटमधून भारतीय व्यक्ती भारतातून अंतराळात जाऊ शकते, असा विश्वास अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मोहीम मौलिक होती. कोणत्याही प्रशिक्षणापेक्षाही ती उत्तम होती.
‘आयएसएस मिशन’चा अनुभव भारताच्या स्वत:च्या गगनयान मोहिमेसाठी उपयुक्त ठरेल. गेली काही वर्षे आपण या मोहिमेबाबत ऐकत आहोत. तुम्ही किती प्रशिक्षण घेतले तरीही जेव्हा तुम्ही रॉकेटमध्ये बसता. त्याचे इंजिन धगधगू लागल्यानंतर तुमच्या मनात वेगळेच विचार यायला लागतात. हा सर्व प्रवास खास आहे. तो मांडण्यासाठी माझ्याकडे शब्द पुरेसे नाहीत, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले की, ७० वर्षांपूर्वी अंतराळ विभाग सुरू झाला. तर ‘इस्त्रो’ची स्थापना १९६९ मध्ये झाली. तरीही अनेक दशकांपासून याबाबत काहीच का घडले नाही. आम्ही खास धोरणे राबवायला सुरुवात केली. त्याचे अनुकरण आता संपूर्ण जग करत आहे. आम्ही निर्माण केलेल्या उद्दिष्टांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली, असे त्यांनी सांगितले.