
नवी दिल्ली : फेब्रुवारीत अंगाची लाहीलाही होत असतानाच मार्च महिना त्यापेक्षा अधिक भीषण असणार आहे. मार्चमध्ये देशात असामान्य व विक्रमी उन्हाळ्याचा त्रास सोसावा लागणार आहे, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशाच्या विविध भागात तापमान ४० अंशाच्या वर जाऊ शकते. मार्चसाठी ही बाब असामान्य आहे. कारण या महिन्यात भीषण गरमी पडणार आहे. दिवस व रात्री तापमान सामान्यापेक्षा अधिक राहणारआहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमान वाढ सुरू होईल. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अनेक राज्यांतील तापमान ४० अंशाच्या वर जाईल.
हवामानातील बदल, प्रदूषण, जंगलतोड, वाढते औद्योगिकीकरण यामुळे देशातील सरासरी तापमानात यंदा फेब्रुवारीपासूनच मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मार्च, एप्रिल, मे व जून महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता अधिकच वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.