LPG घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

मध्यपूर्वेतील अतिसंवेदनशील अशा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून यशस्वीपणे मार्गक्रमण करीत ‘शिवालिक’पाठोपाठ ‘नंदा देवी’ हे जहाज मंगळवारी भारतात दाखल झाले.
‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल
‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल(Photo-X/@NewsX)
Published on

अहमदाबाद : मध्यपूर्वेतील अतिसंवेदनशील अशा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून यशस्वीपणे मार्गक्रमण करीत ‘शिवालिक’पाठोपाठ ‘नंदा देवी’ हे जहाज मंगळवारी भारतात दाखल झाले. या जहाजावर ४६ हजार ५०० मेट्रिक टन एलपीजीचा साठा आहे. यामुळे देशातील इंधन साठा मजबूत राहण्यास मदत होणार आहे. भारत हा एलपीजी आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. विशेषतः घरगुती वापरासाठी एलपीजीची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अशा मोठ्या प्रमाणातील पुरवठ्यामुळे बाजारातील उपलब्धता स्थिर राहील.

सध्याच्या भूराजकीय तणावामुळे ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतही चढ-उतार सुरू आहेत. अशा वेळी भारताने आपला ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ‘नंदा देवी’सारख्या जहाजांचे सुरक्षित आगमन ही देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी सकारात्मक बाब आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, भारतीय नौदल आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांनी या जहाजाच्या सुरक्षित प्रवासावर बारकाईने लक्ष ठेवले होते. होर्मुझ सामुद्रधुनी हा अरुंद आणि संवेदनशील मार्ग असल्याने येथे कोणतीही चूक मोठा धोका निर्माण करू शकते. मात्र, योग्य नियोजन आणि सुरक्षा उपाययोजनांमुळे जहाज सुरक्षितपणे भारतात पोहोचले.

सकारात्मक संकेत

या घटनेमुळे भारताची सागरी क्षमता आणि संकट व्यवस्थापनाची ताकदही अधोरेखित झाली आहे. जागतिक तणावाच्या काळातही भारताने आपला ऊर्जा पुरवठा अखंड ठेवण्याची क्षमता दाखवली आहे. ‘नंदा देवी’चे सुरक्षित आगमन ही केवळ एक वाहतूक घटना नसून, भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने मोठा दिलासा देणारी आणि सकारात्मक संकेत देणारी बातमी ठरली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ७ हजारपेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ला करून इराणची १०० जहाजे आणि युद्धनौका बुडविल्याचा दावा एका पत्रकार परिषदेत केला. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आता अमेरिकेचे नियंत्रण असल्याचेही ते म्हणाले.

ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणचे सरकार संपवण्यासाठी आमचे शक्तिशाली लष्करी अभियान गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. इराणला आम्ही पूर्णपणे उद्धवस्त केले आहे. इराणचे हवाई दल आणि नौदल संपले आहे. इराणची १०० जहाजे आणि युद्धनौका बुडवल्या आहे. अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम आणि त्यांचे रडार नष्ट केले आहे. इराणचे नेते मारले गेले आहेत. ते ४७ वर्षांपासून दहशत पसरवत आहेत. आता त्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.जी काही वर्षांपूर्वी करावयास हवी होती.

logo
marathi.freepressjournal.in