भारताचे ‘एआय मॉडेल’ दहा महिन्यांत येणार; केंद्र सरकारची घोषणा

भारताचे स्वत:चे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल येत्या दहा महिन्यांत येणार असल्याची घोषणा गुरुवारी केंद्र सरकारने केली.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे संग्रहित छायाचित्र
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

नवी दिल्ली : भारताचे स्वत:चे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल येत्या दहा महिन्यांत येणार असल्याची घोषणा गुरुवारी केंद्र सरकारने केली. एआय मॉडेल्स तयार करण्यावर भारताचा प्रकाशझोत असेल, असे केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.

एआयमध्ये अमेरिकेची मक्तेदारी आहे. अमेरिकेच्या वर्चस्वाला चीनचे लहान स्टार्टअप असलेल्या डीपसीकने हादरा दिला. डीपसीकने ओपनएआय, जेमिनी यांच्या एआय मॉडेलला आव्हान दिले आहे. यातच आता भारत सरकारने एआय आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. चॅट जीपीटीसारखे मॉडेल भारतात आणण्याची तयारी केली जात आहे. भारत स्वत:च्या मोठ्या लँग्वेज मॉडेलवर म्हणजेच एलएलएमवर काम करत आहे. येत्या दहा महिन्यांत हे मॉडेल तयार होणार आहे. आम्ही फ्रेमवर्क तयार केले असून ते लाँच केले जाणार आहे. आमचा फोकस ‘एआय मॉडेल्स’ तयार करण्यावर असेल. यात भारतीय कंटेक्स्ट आणि कल्चर असणार आहे, असे वैष्णव म्हणाले.

डीपसीक एआयला २ हजार ‘जीपीयू’ने ट्रेन केले आहे, चॅट जीपीटीला २५ हजार ‘जीपीयू’ने ट्रेन केले आहे, तर आपल्याकडे १५ हजार ‘हाय एंड जीपीयू’ आहेत. भारताकडे भक्कम अशी कंप्युट सुविधा आहे. कोणत्याही लँग्वेज मॉडेलला ट्रेन करण्यासाठी ‘हाय एंड जीपीयू’ची गरज असते. जीपीयू म्हणजेच ‘ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट’. याचा वापर लार्ज लँग्वेज मॉडेलला ट्रेन करण्यासाठी केला जातो. ग्राफिक्स कार्ड विशेष पद्धतीने तयार केली जातात, ज्यामुळे त्याचा वापर एआयसाठी केला जातो. नॉर्मल जीपीयूनेसुद्धा हे काम होऊ शकते, पण त्यासाठी लागणारा वेळ जास्त असतो, असेही ते म्हणाले.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘इंडिया एआय’ मोहिमेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. जवळपास १० हजार कोटींच्या एआय मोहिमेंतर्गत भारतात ‘एआय कंम्प्युटिंग इकोसिस्टिम’ तयार करण्यापासून ते ‘एआय स्टार्टअप्स’ला प्रोत्साहन दिले जात आहे.

सरकारने १८ हजार जीपीयूची कंप्युट सुविधा तयार केली आहे. ही सुविधा स्टार्टअप्स, रिसर्चर्स आणि डेव्हलपर्ससाठी लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. ‘इंडिया एआय मिशन’अंतर्गत तंत्रज्ञानाशिवाय इतर सेक्टरमध्येही एआय वापरले जाईल. यात आरोग्य, शिक्षण, शेती आणि हवामान यांचा समावेश आहे.

- अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री

logo
marathi.freepressjournal.in