वर्षाअखेर पाहिली स्वदेश चीप; भारतातील मजबूत सेमीकंडक्टर उद्योगाचे श्रेय पंतप्रधानांना : वैष्णव

दळणवळण मंत्री तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी नेहमीच एक इकोसिस्टम विकसित करण्यावर भर दिला आहे
वर्षाअखेर पाहिली स्वदेश चीप; भारतातील मजबूत सेमीकंडक्टर उद्योगाचे श्रेय पंतप्रधानांना : वैष्णव

वृत्तसंस्था/दावोस: पहिली मेड-इन-इंडिया चीप डिसेंबरपर्यंत बाजारात येईल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी येथे सांगितले आणि संपूर्ण इकोसिस्टमवर लक्ष केंद्रित करून अल्पावधीत भारतात मजबूत सेमीकंडक्टर उद्योग विकसित करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2024’च्या वार्षिक बैठकीमध्ये पीटीआयशी बोलताना मंत्री म्हणाले की पंतप्रधान मोदींनी जानेवारी २०२२ मध्ये सेमीकंडक्टर धोरण जाहीर केले आणि ते जेव्हा या उद्योगातील वरिष्ठ प्रतिनिधींना भेटले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले की हे एवढे मोठे काम कसे होईल. इतक्या कमी वेळात ते करता येईल का? मात्र, त्या सर्वांनी या धोरणाचे कौतुक केले आणि पंतप्रधान मोदींनी नेहमीच सर्वसमावेशक इकोसिस्टम तयार करण्यावर भर दिला आहे. कारण अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे धोरण नाही आणि त्यामुळे त्यांना असे यश मिळू शकले नाही, असे ते म्हणाले.

दळणवळण मंत्री तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी नेहमीच एक इकोसिस्टम विकसित करण्यावर भर दिला आहे जिथे प्रतिभांवर भरपूर लक्ष केंद्रित केले जाते. १०४ विद्यापीठांसोबत सामंजस्य करार (मेमोरँड ऑफ अंडरस्टँडिंग) आधीच अस्तित्वात आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमात सुधारणा केली जात आहे, स्वतंत्र गुंतवणूक योजनेसह डिझाइनवर बरेच लक्ष केंद्रित केले जात आहे. अनेक डिझाईन कंपन्यांना फायदा झाला आहे आणि त्या हळूहळू मूल्य साखळीत येत आहेत. जगभरातील कंपन्यांकडून या सर्व गोष्टींचे कौतुक होत आहे, ते म्हणाले. मॅक्रॉनचे उदाहरण देताना वैष्णव म्हणाले की, मॅक्रॉनची सुविधा ज्या प्रकारे वेगाने पुढे सरकली आहे, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. जून २०२३ मध्ये करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, तर बांधकाम सप्टेंबर २०२३ मध्ये सुरू झाले होते आणि पहिली मेड-इन-इंडिया चीप डिसेंबर २०२४ मध्ये बाहेर येईल, असे ते म्हणाले. सर्व मॅन्युफॅक्चरिंग सीईओ, इन्व्हेस्टमेंट बँकर्स आणि सेमीकंडक्टर व्यवसाय प्रमुख दावोस येथे या घटकांची कबुली देत आहेत आणि म्हणत आहेत की भारताने एक अतिशय मजबूत सेमीकंडक्टर उद्योग विकसित केला आहे, असे मंत्री म्हणाले.

जपानचे डिजिटल मंत्री कोनो तारो यांनी दावोस परिषदेत शुक्रवारी भारताचे दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जपान- भारताचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, सेमीकंडक्टर इकोसिस्टीम आणि डिजिटल इकॉनॉमी क्षेत्रात सहकार्याची बांधिलकी असल्याचे स्पष्ट केले.

पूर्वीच्या सरकारकडून उद्योगाच्या विकासाकडे दुर्लक्ष

या उद्योगाच्या विकासाकडे पूर्वी फारसे लक्ष का दिले गेले नाही याबद्दल बोलताना वैष्णव म्हणाले की, मोदींची विचार प्रक्रिया नेहमीच दीर्घकालीन दृष्टीवर केंद्रित असते, मग ती संरक्षण उत्पादन, पायाभूत सुविधा गुंतवणूक किंवा विविध क्षेत्रातील सुधारणा असो. ते नेहमी किमान १० वर्षे, २० वर्षे, ३० वर्षे आणि ५० वर्षांचा विचार करतात. आज जे काही केले जात आहे त्याचे देशासाठी अनेक वर्षे परिणाम व्हायला हवेत, अशी त्यांची कल्पना आहे, असे ते पुढे म्हणाले. मंत्री म्हणाले की, पूर्वीचे सरकार दूरदर्शी नव्हते आणि ते फक्त निवडणुकांचा विचार करत असत. तसेच, ‘नीती’ आणि ‘नीयत’मध्ये आवश्यक असलेली स्पष्टता आता आहे. या सर्वांमुळे भारतात जे चांगले काम होत आहे आणि संपूर्ण जग त्याचे कौतुक करत आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in