राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात शंकराचार्यांवर अन्याय; २२ जानेवारीच्या सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय

सोहळ्यात शंकराचार्यांवर अन्याय होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांनी अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात शंकराचार्यांवर अन्याय; २२ जानेवारीच्या सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय

एस. बालकृष्णन/मुंबई : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिर व रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. संपूर्ण देशात राम मंदिरासाठी उत्साहाचे वातावरण पसरले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक महंत, नामवंतांना निमंत्रणे वाटली जात असतानाच हिंदू धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरू कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या सोहळ्यात शंकराचार्यांवर अन्याय होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांनी अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला.

शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती हे काशीत होते. तिथून ते २२ जानेवारीला अयोध्येला जाण्याचे ठरवत होते. मंदिराच्या बांधकामाची माहिती देण्यासाठी त्यांनी नुकतीच अयोध्येला भेट दिली होती. पण, मंदिराच्या

‘कुंभभिषेकम’ सोहळ्यात (प्राणप्रतिष्ठापना) त्यांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे, अशी माहिती शंकराचार्यांचे निकटवर्तीय बी. श्रीधर यांनी दिली. शंकराचार्य सध्या हैद्राबादला असून त्यानंतर ते पुण्याला जातील. २२ जानेवारीला ते अयोध्येला जाणार नाहीत, असे श्रीधर म्हणाले.

श्रीधर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून शंकराचार्य आणि हिंदूंच्या व्यथा व्यक्त केल्या आहेत. अयोध्येत राम मंदिराची उभारणी व त्याचे उद‌्घाटन होत असल्याबद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तथापि, कांची कामकोटी पीठाचे, कांचीपुरमचे माजी पिठाधिश्वर जयेंद्र सरस्वती स्वामीजींनी राम जन्मभूमीसाठी शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले होते. अयोध्येच्या आगामी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ही बाब खरोखरच वेदनादायी आहे. राम मंदिरासाठी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामीजींनी मुस्लिम इमामांसोबत भारताच्या विविध भागात संयुक्त सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले होते. त्याकडे आता पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. संपूर्ण हिंदू समाज ज्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या भव्य सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होता, जो शंकराचार्यांच्या श्रीरामाला त्याच्या जन्मभूमीला परत ठेवण्याच्या स्वप्नाचा कळस होता, असे पत्रात नमूद केले.

राम मंदिराचा खटला अनेक दशके सुरू

रामलल्लाची मूर्ती सध्याच्या जन्मस्थानी योग्यरीत्या ठेवण्यात आली होती. कांची शंकराचार्यांच्या बुद्धिमत्तेमुळेच हे शक्य झाले, याची आठवण पंतप्रधानांना करून द्यावी लागेल. श्री कांची कामकोटी पीठाचे सध्याचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि त्यांना केवळ नियमित निमंत्रित म्हणून बोलावले जाईल, ही बाब दुःखदायक आहे, असे श्रीधर यांनी पंतप्रधानांच्या पत्रात नमूद केले. पंतप्रधान कार्यालयाने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी आग्रह धरला आहे हे कळल्यावर, सध्याच्या कांची शंकराचार्यांच्या संपूर्ण मंडळाने अयोध्येतून परतण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कोणतीही विपरीत परिस्थिती टाळण्यासाठी ते दक्षिणेकडे रवाना झाले आहेत.श्रीधर यांनी कांची शंकराचार्यांचे विचार मांडले आहेत. कोट्यवधी अनुयायी असलेल्या शंकराचार्यांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांना कुंभभिषेक करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in