नवी दिल्ली : साल २०१४ पासून देशात ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात १६.९३ लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली असून आणखी १७.०५ लाख कोटींची गुंतवणूक प्रतीक्षेत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री आर. के. सिंग यांनी सोमवारी दिली.
सध्या देशात ८० गीगावॅट औष्णिक ऊर्जा निर्मिती क्षमता उभारण्याचे काम सुरू आहे. २०३० पर्यंत हे प्रकल्प मार्गी लागतील. तसेच ९९ गीगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे काम देखील सुरू आहे. अशा प्रकारे आतापर्यंत देशात ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात एकूण १६.९३ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
आर. के. सिंग इलेक्ट्रिसिटी सुधारणा नियम २०२४ बाबत पत्रकारांना माहिती देत होते. ते म्हणाले की, १६.९३ लाख कोटी गुंतवणुकीपैकी ११.२ लाख कोटींची गुंतवणूक वीजनिर्मिती, वितरण आणि पारेषण क्षेत्रात करण्यात आली आहे. तर ५.७३ लाख कोटींची गुंतवणूक अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात करण्यात आली आहे. तसेच ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात १७.०५ लाख कोटींची गुंतवणूक प्रतीक्षेत आहे.
यापैकी ७.४ लाख कोटींची गुंतवणूक वीज निर्मिती क्षेत्रात करण्यात येणार आहे. सध्या ४२८ गीगावॅट वीज निर्मिती क्षमता कार्यरत आहे. हे प्रकल्प मार्गी लागल्यानंतर एकूण वीज निर्मिती क्षमता ८०० गीगावॅट होणार आहे. भारताने दरवर्षी ४० गीगावॅट वीज अपारंपरिक क्षेत्रातून निर्माण करण्याचे ठरवले आहे.