राज्यात तीन लाख दहा हजार कोटींची गुंतवणूक येणार; मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर

सुमारे अडीच लाख कोटींची गुंतवणूक या परिषदेच्या माध्यमातून होईल असे नियोजन आहे. ही गुंतवणूक वाढू देखील शकते.
राज्यात तीन लाख दहा हजार कोटींची गुंतवणूक येणार; मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर

मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी १६ जानेवारी रोजी दावोस येथे शिष्टमंडळासमवेत उपस्थित राहणार आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत देखील त्यांच्यासोबत असतील. या परिषदेतील प्रमुख बैठकीत मुख्यमंत्री “नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. त्याचसोबत महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग देखील करण्यात येणार आहे. परदेशी कंपन्यांशी तीन लाख दहा हजार कोटींचे करार केल्यानंतर हे उद्योग मुंबई, पुणे यासह छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, जालना, रायगड या जिल्ह्यांतही येतील.

दावोस येथे १५ ते १९ जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी असे दहा जणांचे शिष्टमंडळ जात आहे. एमएमआरडीए व महाप्रित येथील ८ अधिकारी स्वतंत्ररीत्या सहभागी होत असून या सर्वांना केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या दौऱ्यामध्ये खासगी विमानाचा वापर होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असून गेल्या वर्षी या परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाच्या जवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन (पॅव्हेलियन) उभारण्यात आले असून याठिकाणी मुख्यमंत्री हे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करतील तसेच मुख्यमंत्री प्रमुख विदेशी उद्योगाच्या प्रमुखांशी देखील चर्चा करतील. यासाठी या दालनात बैठक कक्ष बनविण्यात आले आहेत.

१७ तारखेस गौतम अदानी यांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट असून त्यानंतर मुख्य कार्यक्रमात काँग्रेस सेंटरमध्ये “नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास” या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करतील. याशिवाय ‘कृषी, महिला सहभाग व अन्न सुरक्षा’ या विषयावर ठेवण्यात आलेल्या चर्चासत्रात देखील ते सहभागी होतील.

त्यानंतर मुख्यमंत्री मिशेल एडब्ल्यूएस, लिकस्टनस्टाईनचे राजकुमार, हिताची कंपनीचे एमडी, कार्ल्सबर्ग ग्रुप, दस्सो सिस्टिम्स, व्होल्व्हो कार्सच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठकीत सहभागी होतील. स्विसच्या भारतातील राजदूतांसमवेत चर्चा देखील होणार असून यात ८ कंपन्यांचे सामंजस्य करार केले जातील. याशिवाय इतरही प्रमुख कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, माध्यम समूहाचे प्रमुख आदींशी मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री आणि प्रतिनिधी मंडळातील सदस्य संवाद साधणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तीन लाख दहा हजार कोटींचे करार करणार

सुमारे अडीच लाख कोटींची गुंतवणूक या परिषदेच्या माध्यमातून होईल असे नियोजन आहे. ही गुंतवणूक वाढू देखील शकते. २० सामंजस्य करार केले जातील. यामध्ये निपॉन आर सेलर मित्तल, इंडिया ज्वेलरी पार्क, कंट्रोल एस, आयनॉक्स, ए बी ब्रिव्हरी, जिंदाल ग्रुप हुंदाई व अन्य कंपन्यांचा समावेश आहे. सर्व करार परदेशी कंपन्यांशी केले जातील, असे नियोजन करण्यात आले आहे. हे उद्योग मुंबई, पुणे यासह छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, जालना, रायगड या जिल्ह्यांतही येतील.

logo
marathi.freepressjournal.in