सीमा हैदरला निवणुकेचे तिकीट ?

उत्तर प्रदेश एटीएसकडून सीमा हैदरची चौकशी सुरू आहे
सीमा हैदरला निवणुकेचे तिकीट ?

नवी दिल्ली : एनडीएचा घटक असलेल्या आरपीआय आठवले गटाकडून सध्या चर्चेत असलेल्या व पाकिस्तानातून प्रेमासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरला पक्षप्रवेश आणि निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून, सीमा हैदरनेही तो प्रस्ताव स्वीकारला असल्याचे वृत्त एका प्रख्यात हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आरपीआय आठवले गटाकडून सीमाला पक्षाच्या महिला विंगचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमा सातत्याने टीव्ही चॅनेल्सना मुलाखती देत आहेत. त्यातून तिचे संवाद कौशल्य, भाषेवरील पकड स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सीमाला पक्षाकडून प्रवक्तेपदही दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर प्रदेश पोलीस, दहशतवादविरोधी पथक सीमा हैदरची चौकशी करत आहे. तपास यंत्रणांनी सीमाला क्लीनचिट दिल्यावर तिला निवडणुकीचे तिकीट देण्यात येईल. रिपाइंच्या तिकिटावर ती निवडणूक लढवेल, असे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. 'सीमा हैदर पाकिस्तानी नागरिक आहे. ती भारतात आली आहे. जर आपल्या तपास यंत्रणांनी तिला क्लीनचिट दिली, तर तिला भारतीय नागरिकत्व मिळू शकते. सीमाचे पक्षात स्वागत करण्यात येईल. भारतीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवू शकते, असे बाबासाहेबांचा कायदा सांगतो,' असे रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या मासूम किशोर यांनी सांगितले आहे.

पब्जी खेळता खेळता भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या, त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी अवैधपणे भारतात आलेल्या सीमा हैदरची सध्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. मूळची पाकिस्तानची रहिवासी असलेली सीमा नेपाळमार्गे भारतात शिरली. ती बेकायदेशीरपणे भारतात आल्याचे समजताच पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या, मात्र तिला जामीन मिळाला. उत्तर प्रदेश एटीएसकडून सीमा हैदरची चौकशी सुरू आहे. सीमाला चित्रपटात काम करण्याच्या काही ऑफर्स मिळाल्या आहेत. याशिवाय गुजरातमधील उद्योजकाने तिला नोकरी ऑफर केली आहे. यापाठोपाठ सीमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निवडणुकीचे तिकीट देऊ केले आहे.

आरपीआयच्या मासूम किशोर यांची भूमिका

सीमा हैदरची चौकशी सध्या सुरू आहे. तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. त्यांनी तिला दोषी ठरवलेले नाही. सुरक्षा यंत्रणांनी तिला क्लीनचिट दिल्यास आम्ही तिला प्रवक्तेपद देऊ. कारण ती एक चांगली व्यक्ती आहे. तिला भारतीय नागरिकत्व मिळाल्यास रिपाइंच्या निवडणूक चिन्हावर ती निवडणूक लढवेल. तसा आमचा प्रयत्न आहे. २०२४ मध्ये आम्ही तिला निवडणुकीत संधी देऊ शकतो. फक्त त्याआधी तिला भारतीय नागरिकत्व मिळायला हवे, असे किशोर म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in