

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे उच्च जोखीम असलेल्या भागातून मालवाहतूक करणाऱ्या जहाजांसाठी युद्ध कवच पुन्हा मिळवण्यासाठी वाहतुकीच्या कंपन्यांना अतिरिक्त प्रीमियम भरावा लागेल, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जहाजे खास करून तांबडया समुद्राच्या भागातून कच्चे तेल व एलएनजी वाहतुकीत सहभागी आहेत आणि युद्ध कवचासाठी जोखीम संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्यांना अतिरिक्त प्रीमियम भरावा लागेल.
भारतीय तेल कंपन्यांना या भागात मालवाहतुकीवर जोखीम असेल आणि एससीआयला जहाजांच्या संरचनेवर जोखीम असेल. तेलाच्या किमतीवरही तत्काळ वाढीचा दबाव येण्याची शक्यता आहे, पॉलिसीबझार हेड (मरीन इन्शुरन्स) बलासुंदरम आर यांनी सांगितले.
प्रुडंट इन्शुरन्स ब्रोकर्स हेड (मरीन स्पेशालिटी) गौरव अग्रवाल म्हणाले की, १ मार्चला जहाजांच्या संरचनेसाठी युद्ध कवच रद्द करण्याची नोटीस जारी करण्यात आली असून, लवकरच मालवाहतुकीसाठीही अशाच रद्द नोटीसची शक्यता आहे. विमा कंपन्या जहाजांच्या संरचना आणि मालवाहतुकीसाठी प्रीमियम वाढवू शकतात.
सध्याचा संघर्ष गंभीर युद्ध जोखमीचा प्रकार बनला, तर जहाजांसाठी विमा प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे आणि विमा कंपन्या जोखीम पातळीवर आधारित दर लवकर समायोजित करू शकतात. मालवाहतूक विमा प्रीमियम मालाची किंमत पाहून ठरवला जातो, त्यामुळे दर समान राहिल तरी एकूण प्रीमियम रक्कम वाढू शकते, त्यांनी स्पष्ट केले आहे.