

हैदराबाद : हवामान बदल, वायू प्रदूषण आणि हवामानाचे अचूक निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केलेला 'जी-२०' उपग्रह २०२७पर्यंत प्रक्षेपित केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी शनिवारी दिली. हैदराबाद येथील 'इंजिनिअरिंग स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया' मध्ये डीआरडीओ, इस्रो आणि 'एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया'च्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना ते बोलत होते.
ठळक मुद्दे
भारत 'जी-२०' देशांसाठी एका विशेष उपग्रहावर काम करत असून, याचे नेतृत्व भारताकडे आहे. २०२७ च्या कालमर्यादेत याचे प्रक्षेपण करण्याचे उद्दिष्ट आहे. एकाच रॉकेटद्वारे कोणतीही टक्कर न होता १०४ उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडणारा भारत हा जगातील पहिला देश असल्याचे डॉ. नारायणन यांनी अभिमानाने नमूद केले. इस्रोने आतापर्यंत ३४ देशांचे ४३३ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. विशेष म्हणजे, भारताने प्रक्षेपित केलेला आजवरचा सर्वात वजनदार उपग्रह हा देखील एक व्यावसायिक उपग्रहच होता.
आगामी मोहिमा आणि उद्दिष्टे
डॉ. नारायणन यांनी सांगितले की, इस्रो २०४० पर्यंत चंद्रावर भारतीय मानव पाठवण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. जर आपण २०४० पर्यंत हे साध्य केले, तर प्रक्षेपक तंत्रज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान आणि मानवी अंतराळ मोहीम या क्षेत्रांत आपण जगातील कोणत्याही प्रगत राष्ट्राच्या बरोबरीने असू. 'विकसित भारत-२०४७' या स्वप्नासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.