
बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तान (Pakistan) आणि मुंबईच्या २६/११ (Mumbai Attack) रोजी झालेल्या हल्ल्याबाबत केलेले विधान हे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या लोकांना आरसा दाखवला आहे. ते म्हणाले की, " मुंबईतील हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत." असे विधान त्यांनी केले. यावेळी त्यांनी केलेल्या विधानांवर या कार्यक्रमाला उपस्थित असलेला अभिनेता आणि गायक अली जफर यांच्यासह इतरही पाकिस्तानी लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्यांनी केलेल्या विधानावरून सोशल मीडियावर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांचे भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही अनेक चाहते आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये आयोजित फैज फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ते भाषणामध्ये म्हणाले की, "आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या मुंबईवर हल्ला झाला हे आम्ही पाहिले आहे. त्या हल्ल्याचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानात खुलेआम फिरत आहेत. एखाद्या भारतीयाने याबद्धल विचारले तर वाईट वाटून घेऊ नका." असे विधान केले. यावेळी उपस्थितीतांनी टाळ्यादेखील वाजवल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर ते यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "मी केलेल्या विधानांनंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या होत्या. म्हणजे ते माझ्याशी सहमत होते" अशा भावना व्यक्त केल्या.