

जयपूर : येथील प्रसिद्ध नाहरगड बायोलॉजिकल पार्कमध्ये बुधवारी एका महिला सफाई कर्मचाऱ्यावर वाघाने हल्ला केल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुगना असे मृत महिलेचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुगना ही एन्क्लोजर (पिंजरा) क्रमांक १६ मध्ये सफाईचे काम करत असताना 'शिवाजी' नावाच्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला. महिलेचा किंचाळण्याचा आवाज ऐकून इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.काळजीवाहू कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे वाघाचा पिंजरा उघडा राहिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाघ सुरक्षित ठिकाणी बंद असल्याची खात्री न करताच या महिलेला सफाईसाठी आत पाठवण्यात आले होते.
सामान्यतः, पिंजऱ्याची सफाई किंवा देखभालीचे काम सुरू करण्यापूर्वी वाघाला सुरक्षित शेल्टरमध्ये हलवले जाते, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सुरक्षा नियमांचे पालन झाले होते की नाही, याची पोलीस चौकशी करत आहेत. अरवली पर्वतरांगांच्या परिसरात ७२० हेक्टरमध्ये पसरलेले नाहरगड बायोलॉजिकल पार्क जयपूर-दिल्ली महामार्गावर जयपूरपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. विविध वनस्पती आणि वन्यजीवांसाठी प्रसिद्ध असलेले हे पार्क जयपूरमधील प्रमुख पर्यटन स्थळ असून, येथे दररोज शेकडो पर्यटक भेट देतात.