

लातेहार : झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरिया ठाण्यांतर्गत करमटांड जंगलात झालेल्या हवाई रुग्णवाहिकेच्या अपघातात हॉटेल व्यावसायिक संजय साव तथा त्यांच्या कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाला. संजय साव यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्चना देवी आणि पुतणे ध्रुव कुमार यांचा मृत्यू झाला. संजय साव हे हॉटेलमध्ये झालेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी आठ लाख रुपयांचे कर्ज काढून त्यांनी हवाई रुग्णवाहिका बुक केली होती.
संजय साव यांचा बकोरिया येथे हॉटेल व्यवसाय होता. आठवडाभरापूर्वी हॉटेलमधील दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर देवकमल रुग्णालयात उपचार सुरू होते. चांगले उपचार करण्यासाठी एअर रुग्णवाहिकेतून दिल्लीत नेण्यात येत असताना दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
वडिलांची नक्षलवाद्यांकडून हत्या
संजय साव हे लातेहार जिल्ह्यातील चंदवा ठाण्यांतर्गत येणाऱ्या रखात गावामधील रहिवासी होते. ते वडिलांचे हॉटेल चालवित होते. नक्षलवाद्यांनी २००४ मध्ये त्यांच्या वडिलांची हत्या केली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंब हे चंदवा येथे राहण्यासाठी आले होते. बकारिया येथे त्यांनी हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली होती. पित्याच्या मृत्यूनंतर त्यांनी मानसिकदृष्ट्या खचून न जाता कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र, आठ दिवसांपूर्वी हॉटेलमधील शॉर्टसर्किटमध्ये लागलेल्या आगीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या देवकमल रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना दिल्लीमध्ये उपचार करण्याचा सल्ला दिला होता.
दोन्ही मुले झाली अनाथ
संजय साव यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर ८ लाखांची एअर रुग्णवाहिका बुक केली होती. एअर रुग्णवाहिकेतून त्यांची पत्नी आणि भाचा जात होते. बिरसा मुंडा विमानतळावरून एअर रुग्णवाहिकेने उड्डाण केले. रात्री उशिरा एअर रुग्णवाहिका कोसळल्याने त्यामधील सर्वांचा मृत्यू झाला.