

रायपूर : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी-कथाकार विनोद कुमार शुक्ल यांचे वयाच्या ८९व्या वर्षी मंगळवारी (दि. २४) दीर्घ आजाराने निधन झाले. रायपूर येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. मार्च महिन्यातच त्यांना हिंदी साहित्यातील सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता.
छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे १ जानेवारी१९३७ रोजी जन्मलेले विनोद कुमार शुक्ल हे अत्यंत मृदू स्वभावाचे लेखक म्हणून ओळखले जात. साधेपणातून खोल अर्थ उलगडणारी त्यांची भाषा हेच त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. कृषी विज्ञानाचे शिक्षण घेतलेल्या शुक्ल यांना माती, झाडे-वनस्पती आणि निसर्गाशी खास जिव्हाळा होता. हाच जिव्हाळा त्यांच्या कविता, कथा आणि कादंबऱ्यांमध्ये सातत्याने दिसतो. समाज आणि माणूस अधिक माणुसकीने जगावा, हीच त्यांच्या साहित्याची भूमिका होती.
‘लगभग जयहिंद’ या कविता-संग्रहापासून त्यांच्या साहित्यप्रवासाची सुरुवात झाली. पुढे ‘वह आदमी चला गया, नया गरम कोट पहिनकर विचार की तरह’, ‘सब कुछ होना बचा रहेगा’ आणि ‘आकाश धरती को खटखटाता है’ यांसारख्या काव्यसंग्रहांनी हिंदी कवितेला नवी दिशा दिली. कथालेखनातही त्यांनी वेगळाच ठसा उमटवला. ‘नौकर की कमीज’ आणि ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबऱ्यांनी गद्याचे सौंदर्यच बदलून टाकले. ‘पेड़ पर कमरा’ आणि ‘महाविद्यालय’सारख्या कथासंग्रहांतून त्यांनी वेगळच जग वाचकांसमोर उभ केले.
विनोद कुमार शुक्ल यांच्या लेखनाला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. साहित्य अकादमी पुरस्कार, गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप, शिखर सन्मान, राष्ट्रीय मैथिलीशरण गुप्त सन्मान, रघुवीर सहाय स्मृती पुरस्कार आणि अलीकडील ज्ञानपीठ पुरस्कार, असे अनेक सन्मान त्यांच्या वाट्याला आले. त्यांचे साहित्य वाचताना कोणताही दिखावा जाणवत नाही. उलट, माणसाला त्याच्या मुळांकडे, साधेपणाकडे आणि माणुसकीकडे परत नेण्याची ताकद त्यांच्या साहित्यात आहे.