
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते पुढील २ वर्षे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत. १० नोव्हेंबर २०२४ रोजी या पदावरून निवृत्त होतील. ते १६वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे पूत्र आहेत. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना शपथ दिली.
देशाचे मावळते सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड रुजू झाले आहेत. त्यांना १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांनी याआधी अयोध्येतील बाबरी मशीद तसेच गोपनियतेचा अधिकार यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायदानाचे काम केलेले आहे.
कोण आहेत धनंजय चंद्रचूड?
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी मुंबईत झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले. १९९८मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांना १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनवण्यात आले. ते सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. सबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्याशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वडील होते १६ वे सरन्यायाधीश
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे १६वे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड यांचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ असा सुमारे ७ वर्षांचा होता. त्यांच्या निवृत्तीनंतर ३७ वर्षांनी त्यांचेच पुत्र न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची पदावर नियुक्ती झाली आहे.