

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आधीच निष्कर्ष काढून ठेवला होता आणि त्यानुसार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आधी घ्यायला हवा होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष कुणाचा याचा निर्णय देणे अपेक्षित होते. पण शिवसेनेच्या प्रकरणात ही प्रक्रिया उलटी झाल्याचा युक्तिवाद ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. विधिमंडळातील बहुमत आणि राजकीय पक्षाची ओळख या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ३९ आमदार शिंदे गटाकडे होते म्हणून तोच मूळ शिवसेना पक्ष ठरू शकत नाही. या बाबत राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय चुकीचा होता, असेही सिब्बल म्हणाले.
सिब्बल यांनी केलेले दावे बिनबुडाचे - राहुल नार्वेकर
कपिल सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहे, ते काय म्हणतात याच्यातून काही सिद्ध होत नाही असे नार्वेकर म्हणाले. मी जी भूमिका घेतली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले, त्या निकषाच्या आत राहून, त्या आधारावरतीच हा निर्णय दिला दिल्याचे नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांनी काय ठरवले हे त्यांना कसे समजले पहिला प्रश्न हा आहे, असे बिनबुडाचे आरोप करुन कोणताही फरक पडत नाही, मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे, या निर्णयामध्ये कोणताही बदल होईल, असे मला वाटत नाही असेही ते म्हणाले.