बंगळुरू : भाजप सरकार नीच असून ते गरीबांचे शत्रू आहे. ते फक्त भांडवलदारांचे समर्थन करते. त्यांनी शेवटच्या क्षणी कर्नाटकाला तांदूळ देण्यास नकार दिला, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.
ते म्हणाले की, अन्न भाग्य योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला अतिरिक्त पाच किलो तांदूळ पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे तांदळाची मागणी केली होती. मात्र त्यांनी दिले नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अशा पक्षाला एक मतही देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. ‘क्षीर भाग्य’ योजनेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कर्नाटकातील तुमकुरू येथे आयोजित कार्यक्रमात सिद्धरामय्या यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, आम्ही भारतीय अन्न महामंडळाकडून मोफत तांदूळ मागितलेला नाही. आम्ही त्यांना प्रतिकिलो ३६ रुपये देत होतो. सुरुवातीला त्यांनी हो म्हटले, पण शेवटच्या क्षणी नकार दिला. केंद्राच्या दबावाखाली हे काम करण्यात आले. केंद्र सरकारने एफसीआयला आम्हाला तांदूळ देऊ नका, असे निर्देश दिले. भाजपने आपल्या कार्यकाळात तांदळाचे प्रमाण कमी केले.
ते म्हणाले की, माझ्या आधीच्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री असताना गरीबांना ७ किलो तांदूळ मोफत देत होतो, मात्र भाजपच्या मागील सरकारने तो ४ किलो आणि ५ किलोवर आणला. गरीबांना मोफत तांदूळ दिल्यास राज्ये दिवाळखोर होतील असे ते म्हणाले होते, असा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला.