

विजयपुरा : कर्नाटकातील विजयपुरा येथील भूतनाळ तलावात एक महिला आणि तिच्या पाच लहान मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून या महिलेने आपल्या मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शोभा (३५) असे मृत महिलेचे नाव असून, विद्या (१५), सुवर्णा (१३), टिप्पराया (१२), सनिका (१०) आणि विकास (६) अशी मृत मुलांची नावे आहेत.
घटना काय?
२४ ऑगस्ट रोजी कौटुंबिक वादातून शोभा आपल्या चार मुलांना घेऊन घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिने वसतिगृहात असलेल्या तिच्या सर्वात लहान (कर्णबधिर) मुलालाही सोबत घेतले. शोभा यांच्या पतीने (मल्लिकार्जुन जालागेरी - शेतमजूर) यासंदर्भात विजयपुरा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु, त्या महिलेने आपला मोबाईल फोन घरीच सोडल्यामुळे त्यांचा सुगावा लागणे कठीण झाले होते.
सामूहिक आत्महत्या
बुधवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास तलावात सहा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. विजयपुराच पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी ही सामूहिक आत्महत्येची घटना असल्याचे दिसते. मात्र, फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.