जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना एका दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे. ‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला तयार व्हा’, असे धमकीवजा पत्र ‘लष्कर-ए-इस्लाम’ नावाच्या दहशतवादी संघटनेने लिहिले आहे. काही दिवासांपूर्वीच राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर आता या धमकीमुळे काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘लष्कर-ए-इस्लाम’ या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना धमकी दिली आहे. स्थलांतरित कॉलनीच्या अध्यक्षांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले आहे. दहशतवादी संघटनेने पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘सर्व स्थलांतरित आणि आरएसएस एजंट यांनी काश्मीर सोडून जावे; अन्यथा मरायला तयार व्हा. काश्मीरमध्ये आणखी एक इस्त्रायल करून काश्मिरी मुस्लिमांची हत्या करण्याची इच्छा असलेल्या काश्मिरी पंडितांना इथे जागा नाही. तुमची सुरक्षा दुप्पट, तिप्पट केली, तरीही तुम्ही मरणार’ अशी धमकी पत्रातदेण्यात आली आहे