लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन : असा आहे आडवाणींचा प्रवास

"श्री लालकृष्ण आडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशी बोलून हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते आपल्या काळातील सर्वात..."
लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन : असा आहे आडवाणींचा प्रवास

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना केंद्र सरकारकडून देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वरुन याबाबतची माहिती दिली असून आडवाणी यांचे अभिनंदनही केले आहे. केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' जाहीर करण्यात आला. आता केंद्राकडून आडवाणी यांना 'भारतरत्न' जाहीर करण्यात आला आहे.

"श्री लालकृष्ण आडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशी बोलून हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असून भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. तळागळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचा प्रवास होता. आपले गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांची संसदीय कारकिर्द समृद्ध राहिली आहे", असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या 'एक्स'पोस्टमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानातील कराचीत झाला जन्म-

लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी पाकिस्तानातील कराची इथे झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंबाने भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी आडवाणी यांचे प्राथमिक शिक्षण लाहोर येथे झाले. त्यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवीही घेतली आहे. आडवाणी यांचा २५ फेब्रुवारी १९६५ साली कमला आडवाणी यांच्यासोबत विवाह झाला, त्यांना दोन अपत्य आहेत.

लालकृष्ण आडवाणी यांचे राजकीय जीवन-

१९५१ साली जनसंघाची स्थापना झाली. तेव्हापासून आडवाणी यांनी १९५७ पर्यंत जनसंघाचे सचिव म्हणून काम पाहिले. पुढे ते जनसंघाचे अध्यक्षही बनले. १९८० साली भाजपची स्थापना झाल्यानंतर १९८६ पर्यंत त्यांनी भाजपचे सरचिटणीसपद भूषवले. १९८६ ते १९९१ या काळात आडवाणी पक्षाचे अध्यक्ष होते.

भाजपने १९९० साली आडवाणींच्या नेतृत्वात अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन सुरु करत सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली. या रथयात्रेला हिंदु समुदयाचा मोठा पाठिंबा मिळाला. या यात्रेदरम्यान त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. मात्र, या कारवाईमुळे त्यांचे राजकीय वजन आणखीनच वाढले.

आडवाणी हे तीन वेळा भाजपचे अध्यक्ष, चार वेळा राज्यसभा खासदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार राहिले आहेत. १९७७ ते १९७९ या काळात ते पहिल्यांदा केंद्रात कॅबिनेट मंत्री होते, यावेळी त्यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांनी १९९८-२००४ दरम्यान भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम पाहिले. तर, २००२-२००२ या काळात ते देशाचे उपपंतप्रधान होते. आडवाणी यांना २०१५ साली देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in