'इंडिया' आघाडीत भूकंप! ममता बॅनर्जींचा 'एकला चलो रे'चा नारा, म्हणाल्या- आम्ही एकटेच भाजपचा...

मी जे पण सल्ले दिले त्यांना केराची टोपली मिळाली. त्यानंतर आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ते पश्चिम बंगालमध्ये यात्रा काढत आहेत, शिष्टाचारानुसार याची देखील माहिती आपल्याला दिली नाही', असे ममता राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हणाल्या.
'इंडिया' आघाडीत भूकंप! ममता बॅनर्जींचा 'एकला चलो रे'चा नारा, म्हणाल्या- आम्ही एकटेच भाजपचा...

भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोबीपछाड देण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकजूट करत इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र, आता इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. इंडिया आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असेलल्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू-

'मी जे पण सल्ले दिले त्यांना केराची टोपली मिळाली. त्यानंतर आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ते पश्चिम बंगालमध्ये यात्रा काढत आहेत, शिष्टाचारानुसार याची देखील माहिती आपल्याला दिली नाही', असे ममता राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हणाल्या. पुढे, या सर्वांवर आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे. काँग्रेसने 300 जागांवर निवडणूक लढवावी. तसेच, स्थानिक पक्षांना त्यांच्या भागात भाजपसोबत लढू द्यावे, असे आम्ही आधीच सांगितले होते, असेही त्या म्हणाल्या. 'बंगालमध्ये आम्ही एकटेच लढणार, असे मी नेहमी सांगत आलीये. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू', असे त्या म्हणाल्या.

इंडिया आघाडीतील जागा वाटपात मतभेद होत असल्याने आणि इंडिया आघाडीतील डाव्यांचे महत्त्व ममता बॅनर्जी यांना डोईजड वाटू लागल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या पक्षाला योग्य महत्त्व नाही मिळाले तर स्वबळावर निडवणूक लढवण्याचा इशाला दिला होता. आता त्यांनी स्वबळावर लढण्याची घोषणाही केल्यामुळे इंडिया आघाडीच्या भवितव्यावर प्रश्न निर्माण झाले आहेत.

डाव्यांवर केली होती टीका-

स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करण्याआधी त्यांनी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंडिया आघाडीचा अजेंडा राबवू पाहात असल्याची टीका केली होती. इंडिया आघाडीचे 'इंडिया' हे नाव मी सुचवले. पण जेव्हा जेव्हा मी आघाडीच्या बैठकीला जाते तेव्हा तेव्हा डावे पक्ष आघाडीवर नियंत्रण करू पाहात असल्याचे दिसून येते. मी ज्यांच्याशी 34 वर्षांपासून झगडत आहे, त्यांच्याशी मी सहमत होऊ शकत नाही. आघाडीच्या हितासाठी अपमान सहन करूनही मी बैठकांना जात आहे. मी ज्याप्रकारे भाजपला थेट भिडत आहे, त्या प्रकारे कोणीच भिडत नाही, असे ममता यांनी यापूर्वी म्हटले होते.

दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने इंडिया आघाडीचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in