

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेच्या चर्चेच्या पहिल्या टप्प्यात निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांवरील निलंबन मंगळवारी मागे घेण्यात आले. या आठ खासदारांमध्ये काँग्रेसचे सात आणि डाव्या पक्षाच्या एका खासदाराचा समावेश आहे. त्यांना ४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते जेव्हा राहुल गांधी सभागृहात पूर्व लडाखमधील २०२० च्या भारत-चीन सीमा तणावाचा उल्लेख करत होते, तेव्हा झालेल्या गदारोळात पीठासीन अध्यक्ष कृष्ण प्रसाद तेन्नेटी यांच्या खुर्चीच्या दिशेने कागदपत्रे फेकल्याचा आरोप या आठ खासदारांवर करण्यात आला होता.
संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी निलंबन मागे घेण्याबाबतचा प्रस्ताव मांडला तो आवाजी मतदानाने मंजूर झाला.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्वरित प्रभावाने निलंबन रद्द झाल्याची घोषणा केली. सर्व पक्षांनी सभागृहाची मर्यादा, प्रतिष्ठा आणि परंपरा जपण्याचे आश्वासन दिल्याचे बिर्ला यांनी सांगितले. संसद परिसरात फेक फोटो, एआय जनरेटेड किंवा बॅनर पोस्टरचा वापर टाळावा, असे आवाहनही बिर्ला यांनी केले.