

नवी दिल्ली : अमेरिका-इस्त्रायलच्या इराणसोबतच्या युद्धामुळे देशभरात एलपीजीची टंचाई वाढत आहे. गॅस सिलिंडर एजन्सींबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्याशिवाय बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये गॅस सिलिंडरचा काळाबाजारही सुरू झाला आहे.
बिहारमध्ये घरगुती गॅस सिलिंडर १८०० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. तर मध्य प्रदेशात व्यावसायिक सिलिंडर काळ्या बाजारात ४,००० रुपयांना विकला जात आहे. इतकेच नाही, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर बंदी आल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये इंडक्शनवर स्वयंपाक करणे सुरू झाले आहे. १,९१८ रुपयांचा व्यावसायिक सिलिंडर भोपाळमध्ये काळ्या बाजारात ४,००० रुपयांना विकला जात आहे. भोपाळमधील बरखेडा पठानी येथील भारत गॅस एजन्सीमध्ये उघडपणे ४ हजार रुपयांना सिलिंडर विकला जात आहे.
सरकारने काळाबाजार रोखण्यासाठी आवश्यक वस्तू अधिनियम लागू केला आहे, पण काळाबाजार करणाऱ्यांवर त्याचा परिणाम झालेला नाही. या प्रकारात एक खाजगी गॅस एजन्सी चालक, कर्मचारी आणि दलालही सामील आहेत. याशिवाय गॅसची अवैध रिफिलिंग करणारेही संधीचा फायदा उठवत आहेत.
उत्तर प्रदेशात ब्लॅकमध्ये १६०० रुपये दिल्यावर सिलिंडर लगेच मिळत आहे. एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्याचे दरही गगनाला भिडले आहेत. लखनऊमध्ये दिवसभर रांगेत उभे राहूनही लोकांना सिलिंडर मिळत नाही. लोकांचा दावा आहे की, टंचाईमुळे ९५० रुपयांचा सिलिंडर १६०० रुपये दिल्यावर लगेच मिळत आहे. व्यावसायिक सिलिंडरही ३५०० रुपयांमध्ये सहज उपलब्ध आहे.
पंजाबमध्येही लोक एजन्सींसमोर सिलिंडर घेऊन रांगेत उभे आहेत, तरीही गॅस मिळत नाही. पंजाबमध्ये व्यावसायिक सिलिंडर मिळणे बंद झाले आहे, तर घरगुती सिलेंडरसाठीही बुकिंगमध्ये समस्या येत आहे.
कोटामध्ये गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे लाकूड आणि कोळशाच्या भट्टीची मागणी वाढली आहे. मेस आणि वसतिगृहांसाठी ३५ ते ४० किलो वजनाच्या भट्ट्या बनवल्या जात आहेत, पण वाढत्या मागणीमुळे पुरवठा करणे कठीण होत आहे.