९४००० मेट्रिक टन LPG घेऊन २ जहाजे भारताकडे; सोमवार, मंगळवारी पोहोचणार

होर्मुझची सामुद्रधुनी पार करून बीडब्ल्यू टीवायआर आणि बी डब्ल्यू ईएलएम ही दोन जहाजे भारताच्या किनाऱ्याकडे येत असून यापैकी एक जहाज ३१ मार्च रोजी मुंबईत तर दुसरे जहाज १ एप्रिल रोजी मंगळुरूमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे.
९४००० मेट्रिक टन LPG घेऊन २ जहाजे भारताकडे; सोमवार, मंगळवारी पोहोचणार
Published on

नवी दिल्ली : होर्मुझची सामुद्रधुनी पार करून बीडब्ल्यू टीवायआर आणि बी डब्ल्यू ईएलएम ही दोन जहाजे भारताच्या किनाऱ्याकडे येत असून यापैकी एक जहाज ३१ मार्च रोजी मुंबईत तर दुसरे जहाज १ एप्रिल रोजी मंगळुरूमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. या दोन जहाजांवर ९४ हजार मेट्रिक टन एलपीजी आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने बंदरे, आणि जलमार्ग मंत्रालयाचा हवाला देत सांगितले.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले की, भारतीय जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. युरिया प्रकल्पांना होणारा पुरवठा मागील ६ महिन्यांच्या सरासरीच्या ७०-७५ टक्क्यांवर स्थिर आहे, तर पुरवठा टिकवण्यासाठी अतिरिक्त एलएनजी आणि आरएलएनजीची व्यवस्था केली जात आहे अशीही माहिती देण्यात आली आहे.

डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग हे जहाजमालक, आरपीएसएल एजन्सी आणि भारतीय दूतावासांसह परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शनिवारी गुजरातमधील जामनगर येथे डीपीए कांडला अंतर्गत वडिनार टर्मिनलवर ४७,००० मेट्रिक टन एलपीजीचा साठा पोहोचला आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. तसेच भारतीय नौदलाच्या युद्धनौका व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी सज्ज आहेत. अशाही माहिती देण्यात आली आहे.

घडामोडींवर लक्ष

शासनाचे अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून विविध संस्थांशी समन्वय साधत आहेत. भारताने होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि अखंड समुद्री वाहतूक कायम ठेवण्यासाठी आवाहन केले आहे. देशाच्या ऊर्जा हितांचे रक्षण करण्यासाठी या प्रदेशातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सरकारकडून अनेकदा स्पष्ट करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in