

भोपाळ : बालाघाट जिल्ह्यात झालेल्या आदिवासी मुलांच्या मृत्यूच्या घटनेवरून 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सरकारवर उपरोधिक टीका केली. त्यांनी 'मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा' देत असल्याचे सांगणारे एक उपरोधिक पत्र 'एक्स'वर पोस्ट केले. या पत्रात दीपके यांनी, "बालाघाटमध्ये ३० हून अधिक आदिवासी मुलांचा मृत्यू झाल्यानंतर या खुर्चीवर राहण्याची माझी सदसद्विवेकबुद्धी मला परवानगी देत नाही," असे नमूद करत आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
मध्य प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची "संधी" दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही या उपरोधिक पत्रातून आभार मानले. मात्र, ही संधी आपण "योग्य पद्धतीने साधू शकलो नाही", असेही त्यांनी म्हटले.
या उपरोधिक पत्रातून दिपके यांनी बालाघाटमधील मृत्यूंच्या प्रकरणी सरकारने केलेल्या हाताळणीवर, विशेषतः मृतांच्या कुटुंबीयांसाठी जाहीर केलेल्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "जर मृत्यू झालेले मुले मंत्री किंवा आमदारांची असती, तर २४ लाख रुपयांची भरपाई पुरेशी ठरली असती का?" असा सवालही त्यांनी केला.
बालाघाटचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डी. पी. बर्मन यांच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या २४ मुलांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. बालाघाटमधील काही आदिवासी कुटुंबे अद्याप नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे दिपके यांनी निदर्शनास आणले. तसेच अनेक गावांमधील शाळांची अवस्था जनावरांच्या गोठ्यांपेक्षाही खराब असल्याचा आरोप त्यांनी केला.
न्यायालयाची दखल
बालाघाट जिल्ह्यात संसर्गजन्य आजारांमुळे ३० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाने याच आठवड्यात दखल घेतली. न्यायालयाने राज्य सरकारकडून या प्रकरणी उत्तर मागितले आहे.
या जनहित याचिकेत मुलांना पुरेसे उपचार मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला असून, केवळ ५० खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात सुमारे ४०० मुलांवर उपचार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.