
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची बोलेरो आणि महाकुंभमेळ्यातून संगम स्नान करून परतणाऱ्या भाविकांच्या बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे तर १९ जण जखमी झाल्याची माहिती आहे. प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर शुक्रवारी (दि.१४) रात्री हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात भर्ती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
यमुनानगरचे डीसीपी विवेकचंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड कोरबा येथून भाविकांना महाकुंभमेळ्याला घेऊन जात असलेली बोलेरो समोरून येणाऱ्या बसला धडकली. प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास मेजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वरूप राणी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
अपघातात बोलेरो चालकासह गाडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्याचे रहिवासी असून सर्व भाविक महाकुंभमेळ्याला जात होते. मयतांच्या खिशातील आधारकार्ड आणि मोबाईल नंबरद्वारे त्यांची ओळख पटली असून पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळवले आहे. त्यांचे कुटुंबीय छत्तीसगड येथून घटनास्थळी रवाना झाले आहेत.
तर बसमधील १९ जण जखमी झाले आहेत. बसमधील सर्व प्रवाशी मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ही बस महाकुंभमेळ्यात संगम स्नानानंतर भाविकांना घेऊन वाराणसीला परत जात होती. सर्व जखमींना रामनगर येथील सीएचसी येथे दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी स्वरूप राणी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून जलदगतीने मदतकार्य करण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि या घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी आशा व्यक्त केली आहे.
तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या घटनेविषयी संवेदना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडिया पोस्टवर त्यांनी म्हटले आहे की, ''उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील मिर्झापूर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करते. जखमी झालेल्या सर्वांनी लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करते,'' असे त्यांनी म्हटले आहे.