देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात; २२,२०७ जणांनी संपवले जीवन

पश्चिम बंगालमध्ये १३,५००, कर्नाटकात १३,५०५ जणांनी आत्महत्या केल्या.
 देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात; २२,२०७ जणांनी संपवले जीवन

भारतात बेरोजगारी, एकटेपणा, कौटुंबिक समस्या, दारूचे व्यसन आणि आर्थिक समस्या आदींमुळे आत्महत्या वाढत आहेत. २०१९मध्ये भारतामध्ये एक लाख ६४ हजार जणांनी आत्महत्या केल्या. २०२० मध्ये देशात एक लाख ५३ हजार ५२ लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये आत्महत्यांमध्ये ७.२ टक्के वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात, त्यानंतर तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात झाल्या आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक २२,२०७, तामिळनाडूत १८,९२५ तर मध्य प्रदेशात १४,९६५ जणांनी आत्महत्या केल्या. पश्चिम बंगालमध्ये १३,५००, कर्नाटकात १३,५०५ जणांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात २०२०च्या तुलनेत आत्महत्येचे प्रमाण साडेतेरा टक्क्यांनी वाढले आहे, तर तामिळनाडूमध्ये ११.५ टक्के, मध्य प्रदेशात ९.५ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ८.२ टक्के, तर कर्नाटकामध्ये आठ टक्के वाढ झाली आहे. वरील पाच राज्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण ५०.४५ टक्के आहे, तर अन्य राज्यांमध्ये हेच प्रमाण ४९.५६ टक्के आहे.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात आत्महत्येचे प्रमाण केवळ ३.६ टक्के आहे. देशाची राजधानी दिल्लीत २०२१ मध्ये २,८४० आत्महत्या झाल्या, तर अन्य ५३ शहरांमध्ये २५,८९१ आत्महत्या झाल्या आहेत. ही माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिली आहे.

२०२१ मध्ये महिलांच्या विरोधातील अत्याचारात महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिल्या तीनमध्ये लागला आहे. अपहरण, आत्महत्येस प्रवृत्त करणे, महिलांवरील हल्ले आदी घटना राज्यात वाढीस लागल्याने राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. उत्तर प्रदेशात २०२१ मध्ये ४२८२७८, राजस्थानात ४०७३८ तर महाराष्ट्रात ३९५२६ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in