भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनमधून परतल्यानंतर भारताला 15 मार्चपर्यंत आपले सैन्य माघारी घेण्याची 'डेडलाईन' दिली आहे. मुइज्जू हे पाच दिवसीय चीन दौऱ्यावर गेले होते. शनिवारी ते चीनमधून मालदीव परतले. यानंतर त्यांनी "आम्ही लहान आहोत याचा अर्थ कोणत्याही देशाकडे आम्हाला धमकावण्याचे लायसन्स नाही, असे वक्तव्य केले होते. याच बरोबर त्यांनी त्यांच्या निवडणुक प्रचारात India Out सारखी घोषणा देखील दिल्याचे सांगितले जात आहे.
सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी मालदीव आणि भारताने उच्चस्तरीय कोअर ग्रुप तयार केला आहे. रविवारी या गटाची माले येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात पहिली बैठक झाली. या बैठकीला भारतीय उच्चायुक्त मुनू महावरही उपस्थित असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
मालदीव सरकारमधील एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष मुइज्जू यांनी औपचारिक पणे भारताने 15 मार्चपर्यंत आपल्या सैन्याला मालदीवमधून माघारी घ्यायला सांगितले.
मीडियारिपोर्टनुसार, "भारतीय सेना मालदीवमध्ये राहू शकत नाही हे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू सरकारचे धोरण आहे", असे मुइज्जू यांचे कार्यालयातील सार्वजनिक धोरण सचिव अब्दुल्ला नाजीम इब्राहिम यांनी सांगितले आहे. सरकारी आकड्यांनुसार मालदीवमध्ये सध्या 88 भारतीय जवान आहेत.
दरम्यान, मालदीवने दिलेल्या या डेडलाईनवर भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.