

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे भविष्य पुरते उद्ध्वस्त केले आहे असा थेट आरोप करत, आता काँग्रेस पक्षाने तरुणांसाठी एक व्यापक 'शिक्षण-ते-रोजगार रोडमॅप' तयार करण्याची वेळ आली आहे, असे ठाम प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी येथे केले.
इंदिरा भवन येथे आयोजित काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील आपल्या प्रास्ताविक भाषणात खर्गे यांनी मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यासोबतच राम मंदिर देणग्यांमधील कथित घोटाळ्यावर पंतप्रधान मोदींच्या मौनावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी देशाची आणि भाविकांची माफी मागावी, अशी मागणी केली.
विद्यार्थ्यांमधील संताप अचानक आलेला नसून सरकारच्या दुर्लक्षामुळे त्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे.राहुल गांधी यांनी 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा आवाज राष्ट्रीय स्तरावर पोहोचवला आहे. काँग्रेस पक्ष आता तरुणांसाठी एक स्पष्ट, सर्वसमावेशक आणि वेळेचे बंधन असलेला 'शिक्षण-ते-रोजगार रोडमॅप' तयार करेल.
राम मंदिर देणग्यांमधील मोठ्या कथित घोटाळ्याचा मुद्दा जनतेत गाजत आहे. पंतप्रधानांनी संसदेत ट्रस्ट स्थापनेची घोषणा केली होती. लोकांनी विश्वासाने सोने, चांदी आणि निधी दान केला, पण आता मोठा घोटाळा समोर आला आहे.तिथे मिळालेल्या एकूण दानाचा आणि मौल्यवान वस्तूंचा हिशोब काय आहे, हे फक्त काही लहान कर्मचाऱ्यांना तुरुंगात पाठवून सुटणारे नाही, तर मोदींनी यावर मौन सोडून देशवासीयांची माफी मागितली पाहिजे.