मोदींकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा 'गैरवापर' करत असल्याचा खळबळजनक आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केला. हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे एका निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
मोदींकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप
मोदींकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप
Published on

तारकेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा 'गैरवापर' करत असल्याचा खळबळजनक आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केला. हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे एका निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

महिला आरक्षण विधेयकाबाबत देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी भाजपसाठी "बेकायदेशीर प्रचार" केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, भाजपने काल राजकीय प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला. आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत." पंतप्रधानांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

प्रकरण काय

कायदेमंडळात महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक २०२९ पासून लागू करण्याबाबतचे विधेयक लोकसभेत फेटाळल्यानंतर, शनिवारी पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले होते. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्षांना इशारा दिला होता की, "भ्रूणहत्येच्या पापासाठी" भारतातील महिला त्यांना कठोर शिक्षा करतील. यावर ममता म्हणाल्या, "तुम्ही तुमच्या पक्षासाठी बेकायदेशीर प्रचार करत आहात, याचे उत्तर तुम्हाला देशातील जनतेला द्यावे लागेल. महिला आरक्षण विधेयक सप्टेंबर २०२३ मध्येच मंजूर झाले होते.

आय-पॅकने काम थांबवल्याचे वृत्त तृणमूलने फेटाळले

कोलकाता / तारकेश्वर :

निवडणूक रणनीतीकार कंपनी 'आय-पॅक'ने पश्चिम बंगालमधील आपले काम थांबवल्याचे वृत्त तृणमूल काँग्रेसने पूर्णपणे फेटाळून लावले आहे. ही बातमी "पूर्णपणे निराधार" असल्याचे सांगत, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार निवडणुकीच्या काळात तृणमूलची प्रचार यंत्रणा कमकुवत करण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप पक्षाने रविवारी केला.

२०२१ पासून तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या 'इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी'ने आपल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ काम थांबवून २० दिवसांच्या सुटीवर जाण्यास सांगितल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तृणमूलने ही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तपत्रातील दाव्यानुसार, आय-पॅकने शनिवारी रात्री कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला होता. त्यात "कायदेशीर बंधनांचा" हवाला देत ११ मे पर्यंत पश्चिम बंगालमधील काम स्थगित राहील, असे म्हटले होते.

मात्र, आय-पॅकने अधिकृतपणे कोणतीही भूमिका अद्याप मांडलेली नाही. तृणमूलने मात्र अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्ट केले की, आय-पॅक प्रचारातून मागे हटलेली नाही.

ममतांचा भाजपवर घणाघात

तारकेश्वर येथील प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. आय-पॅकचे थेट नाव न घेता त्या म्हणाल्या की, जर केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या सोडाव्या लागल्या, तर आमचा पक्ष त्यांना सामावून घेईल.जर या तरुण कर्मचाऱ्यांना धमकावून काम सोडण्यास भाग पाडले जात असेल, तर त्यांना आम्ही नोकरी देऊ. मी एकही मुलगा बेरोजगार होऊ देणार नाही. मी सकाळीच अभिषेकशी यावर चर्चा केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in