कोलकाता : भाजपमध्ये प्रवेश करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशा आशयाच्या धमक्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिल्या जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी येथे केला.
पुरुलिया जिल्ह्यात एका निवडणूक सभेत त्या बोलत होत्या. सक्तवसुली संचालनालय (ईडी), सीबीआय, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि आयकर विभाग हे भाजपची शस्त्रे म्हणून काम करीत आहेत, असा आरोपही ममतांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा छळ करण्यासाठी वरील यंत्रणांचा वापर केला जात आहे. पूर्वसूचनेविनाच छापे टाकले जात असून घरात जबरदस्तीने घुसण्याचे प्रकारही घडत आहेत. रात्री सर्वजण निद्रावस्थेत असताना कोण घरात घुसला तर महिलांनी काय करायचे, असा सवालही ममतांनी केला.
भाजपमध्ये प्रवेश करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा धमक्या मध्यवर्ती यंत्रणांकडून तृणमूलचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. मनरेगा, पीएम-आवास योजनेच्या निधीपासून पश्चिम बंगालला वंचित ठेवले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.