"दीदी तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणार"! पश्चिम बंगालमध्ये ‘वक्फ’ विधेयक लागू होणार नाही; ममतांनी घेतली ठाम भूमिका

'वक्फ' विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी होऊन त्याचे कायद्यामध्ये रूपांतर झाले असले तरी या विधेयकाला सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने आता ठाम विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.
"दीदी तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणार"! पश्चिम बंगालमध्ये ‘वक्फ’ विधेयक लागू होणार नाही; ममतांनी घेतली ठाम भूमिका
X @NyraKraal
Published on

कोलकाता : 'वक्फ' विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी होऊन त्याचे कायद्यामध्ये रूपांतर झाले असले तरी या विधेयकाला सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने आता ठाम विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा विधेयक लागू होणार नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, वक्फ कायदा मंजूरच व्हावयास नको होता. पश्चिम बंगालमध्ये ३३ टक्के अल्पसंख्याक आहेत. मी त्यांचे काय करणार, ममता यांनी वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात पक्षाची स्पष्ट भूमिका मांडली आहे. बुधवारी कोलकात्यामध्ये जैन समुदायातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला ममता बॅनर्जी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित होत्या. या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी वक्फ सुधारणा विधेयकाबाबत पक्षाची व पश्चिम बंगाल सरकारची भूमिका स्पष्ट केली. ज्याप्रमाणे कोणालाही माझी मालमत्ता हिसकावून घेण्याचा अधिकार नाही, त्याचप्रमाणे मलाही इतरांची मालमत्ता हिसकावून घेण्याचा अधिकार नाही. पश्चिम बंगालमध्ये मी ते कधीही होऊ देणार नाही.

काय म्हणाल्या ममता?

पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा विधेयक लागू होणार नसल्याचे ममतांनी यावेळी स्पष्ट केले. मला कल्पना आहे की वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यामुळे तुमच्या मनात असंतोष आहे. पण बंगालमध्ये असे काहीही घडणार नाही ज्यातून ‘फोडा आणि राज्य करा’ धोरणातून एखादी व्यक्ती सत्ता गाजवेल. सगळ्यांनी एकत्र राहायला हवे आहे, असा संदेश तुम्ही द्या, असे ममता म्हणाल्या. राजकीय चळवळीसाठी काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असतील, पण त्यांच्या भडकवण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, असे आवाहनही ममता यांनी उपस्थितांना केले.

आमचे सरकार अल्पसंख्याक समुदायाच्या हितांचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे त्या म्हणाल्या. "पश्चिम बंगालमध्ये, अल्पसंख्याक समुदायाचे लोक लोकसंख्येच्या जवळजवळ ३३ टक्के आहेत. नेहमी लक्षात ठेवा की तुमची दीदी तुमचे आणि तुमच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आहे. आपले ध्येय- 'जिओ और जीने दो (जगा आणि जगू द्या)'," आहे असे मुख्यमंत्री म्हणाल्या.

मुर्शिदाबादचा केला उल्लेख

बांगलादेशातील परिस्थिती बघा. हे (वक्फ विधेयक) आता मंजूर व्हायला नको होते, असेही त्या म्हणाल्या. मुर्शिदाबादमध्ये वक्फ विधेयकावरून हिंसाचार झाल्याचे समोर आले असून त्या घटनेचा उल्लेख ममता बॅनर्जी यांनी केला. बांगलादेशच्या सीमाभागातील परिस्थिती तुम्ही पाहा. या परिस्थितीत वक्फ सुधारणा विधेयक मंजूरच व्हायला नको होते, असे त्या म्हणाल्या. इतिहासात लिहिले आहे की, पश्चिम बंगाल, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत हे सगळे एकत्रच होते. फाळणी नंतर झाली. पण आता जे इथे राहात आहेत, त्यांना संरक्षण देणे हे आपले काम आहे. जर लोक एकत्र राहिले, तर ते जग जिंकू शकतात. काही लोक तुम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी भडकवण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही असे काही करू नका असे माझे तुम्हाला आवाहन आहे. "लोकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न देशाचे भविष्य उद्ध्वस्त करतील. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. त्यामुळे देश कमकुवत होईल. एकतेचा मार्ग अवलंबला तरच देश अधिक मजबूत होईल," असेही ममतांनी यावेळी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in