
इम्फाळ : गेल्या काही वर्षांपासून अशांततेच्या फेऱ्यात असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी एनडीएने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या नेतृत्वात १० आमदारांनी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेत ४४ आमदारांचे समर्थ असल्याचा दावा केला.
मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ११व्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. भाजपने ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असला तरी केवळ २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना दिले आहे. राज्यपाल अजयकुमार भल्ला यांनी एनडीएच्या आमदारांची भेट घेतली. तेव्हा राजकीय अनिश्चिततेच्या काळात स्थिर सरकारचा पर्याय देऊ शकतो, असे आश्वासन राज्यपालांना दिले.
२२ जणांच्या सह्या
राज्यपालांना आम्ही सादरीकरण केले त्यावर २२ आमदारांच्या सह्या आहेत. एनडीए आमदार सरकार स्थापन करण्यास खूप उत्सुक आहेत. यासाठी १० आमदार राज्यपालांच्या भेटीला आलो आहोत, असे अपक्ष आमदार निशिकांत सिंह यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या आमदारांनी पत्र पाठविले होते. यात मणिपूरमध्ये शांतता नांदविण्यासाठी लोकप्रिय सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती. या पत्रावर भाजपच्या १३, एनपीपी व नागा पीपल्स फ्रंटचे प्रत्येकी तीन आणि दोन अपक्ष अशा २१ आमदारांच्या सह्या होत्या.
राज्यपालांकडून अपेक्षा
राज्यपालांच्या भेटीनंतर आमदार राधेश्याम यांनी त्याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, आम्हाला ४४ आमदारांचा पाठिंबा आहे. जनतेच्या इच्छेनुसार सरकार स्थापन करण्यास तयार आहोत. राज्यपालांनी आमच्या बहुमताचा विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. राज्यपालांकडून संविधानिक तरतुदींनुसार निर्णय घेण्याची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.