

इम्फाळ : वांशिक हिंसाचारात जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ धुमसत असलेल्या मणिपूरमधील जनतेची मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मंगळवारी माफी मागितली. संपूर्ण वर्ष खूप दुर्दैवी होते. आपल्याला खेद वाटत असून राज्यातील जनतेची माफी मागतो, असे सिंह यांनी म्हटले आहे. हिंसाचाराच्या उद्रेकात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे, तर अनेकांना बेघर व्हावे लागले आहे, ही खेदाची बाब आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे.
मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यात शांतता निर्माण करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रगती झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नवे वर्ष २०२५ पासून मणिपूरमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती परत येईल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राज्यातील सर्व समुदायांना आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले की, जे काही झाले ते झाले, आता आपण भूतकाळातील चुका माफ करून त्या विसरल्या पाहिजेत आणि आपल्याला एक नवीन जीवन, शांत मणिपूर, समृद्ध मणिपूरची सु्रुवात करावी लागेल, असेही सिंह म्हणाले.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे आणि चर्चा आणि संवाद हाच त्याचा एकमेव मार्ग आहे, ज्याच्यासाठी केंद्र सरकारने आधीच पुढाकार घेतला आहे. मणिपूरमध्ये आरक्षण आणि आर्थिक लाभावरून बहुसंख्य मैतेई आणि कुकी समुदाय यांच्यात मे २०२३ पासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात २०० हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. सुमारे १२,२४७ एफआयआर नोंदवले गेले आहेत. तसेच ६२५ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर सुमारे ५,६०० शस्त्रे आणि स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
राज्याचे प्रश्न हाताळण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. केंद्र सरकारने विस्थापित कुटुंबांना मदत करण्यासाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी आणि पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. व्यक्तींसाठी नवीन घरे बांधण्यासाठी पुरेसा निधी देण्यात आला आहे, असेही सिंह यांनी सांगितले.