

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या 'देशद्रोही' या विधानाचा वाद आता पेटला आहे. यावर प्रतिक्रिया देताना पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप जे पेरतो तेच आता त्यांच्यासमोर येत असून, अनेक वर्षे मुस्लिमांना आणि धर्मनिरपेक्ष लोकांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपला त्यांच्याच कर्माची फळे मिळत असल्याचे मुफ्ती यांनी सांगितले.
शोपिआन येथे पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्र्यांनी या वादावर स्पष्ट भूमिका घेतली. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर एवढा गदारोळ का केला जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपनेच सर्वप्रथम मुस्लिमांना आणि धर्मनिरपेक्ष व्यक्तींना देशद्रोही म्हणायला सुरुवात केली होती, अशी आठवण त्यांनी करून दिली. पूर्वी हे लोक 'पाकिस्तानला जा' असे म्हणायचे, तर आता 'इराणला जा' असे म्हणत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. मुस्लिमांची घरे बुलडोझरने पाडली गेली, तेव्हा कोणीही अवाक्षर काढले नाही, असा टोला त्यांनी लगावला.
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना उघडपणे देशद्रोही म्हणण्याचे आवाहन त्यांनी केले होते.