

नवी दिल्ली: भारताने बहुस्तरीय बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स (बीएमडी) प्रणालीची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याची चाचणी यशस्वी केली. भारत अशा प्रकारची क्षमता असणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. हे 'बीएमडी' शत्रूची येणारी लांब पल्ल्याची अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे आणि 'अॅवॉक्स' सह शत्रूची विमाने हवेतच रोखण्यास सक्षम आहेत. अमेरिका, रशिया आणि चीनसह अतिशय मोजक्या देशांकडे बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स (बीएमडी) क्षमता असल्याचे ओळखले जाते. या बीएमडी यंत्रणेच्या सलग तीन उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या.
पृथ्वीच्या वातावरणात आणि बाहेरही शत्रूची येणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पाडण्याच्या क्षमतेची तपासणी करण्यासाठी या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विविध प्रकारच्या शत्रूच्या आव्हानांविरुद्ध देशाची संरक्षण क्षमता मजबूत करणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रदर्शन केले आहे, असे मंत्रालयाने शनिवारी सांगितले.