
सिंधू जल कराराच्या स्थगितीवरून भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विधानाचा बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे नेते मिथून चक्रवर्ती यांनी खरपूस समाचार घेतला. "जर अशी वक्तव्य करत राहिलात, आणि आमचं डोकं फिरलं तर एकामागोमाग एक ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागली जातील" असे चक्रवर्ती म्हणाले.
आमचं डोकं फिरलं तर एकामागोमाग एक ब्रह्मोस्त्र डागणार
मंगळवारी सकाळी माध्यमांनी भुट्टो यांनी भारताला दिलेल्या युद्धाच्या धमकीबाबत मिथून चक्रवर्ती यांना प्रश्न विचारला. त्यावर, पाकिस्तानच्या जनतेला युद्ध नकोय, मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. पण, जर अशी वक्तव्ये (भुट्टोंनी दिलेली धमकी) करत राहिलात, आणि आमचं डोकं फिरलं तर एकामागोमाग एक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली जातील" असे चक्रवर्ती म्हणाले.
एकही गोळी चालवणार नाही...पण पाकिस्तानमध्ये त्सुनामी येईल
पुढे बोलताना त्यांनी पाकिस्तानवर व्यंगात्मक टीप्पणी करताना झोंबणारी टीका केली. "आम्ही एक धरण बांधायचा विचार करीत आहोत. १४० कोटी जनता रात्रीतून तेथे लघुशंका करेल. त्यानंतर धरणाचे दरवाजे उघडून देऊ....एकही गोळी चालवणार नाही...पण पाकिस्तानमध्ये त्सुनामी येईल", असे चक्रवर्ती म्हणाले. "ही बाब मी केवळ भुट्टोंसाठी म्हणालो, पाकिस्तानच्या जनतेसाठी माझं हे म्हणणं नाही", असंही त्यांनी लगेचच स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते भुट्टो?
सोमवारी सिंध प्रांतातील एका कार्यक्रमात भुट्टो यांनी, "भारताने जर सिंधू जल करार पुन्हा बहाल केला नाही, तर तो आमच्या इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेवर हल्ला आहे." यासोबतच भुट्टो यांनी भारतावर पाकिस्तानला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की भारताची जलनीती आक्रमक आहे. आपल्या भाषणादरम्यान बिलावल यांनी , युद्धाच्या परिस्थितीत पाकिस्तानातील लोक भारताला सामोरे जाण्याची ताकद ठेवतात. जर असे झाले, तर पाकिस्तान सर्व सहा नद्या परत घेऊ शकतो, अशी धमकीही दिली होती. दरम्यान, भूट्टोंनी गरळ ओकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जूनमध्ये पाकिस्तानच्या संसदेत बोलताना, 'जर सिंधू नदीच्या पाण्याचा वाटा मिळाला नाही तर पाकिस्तान भारताशी "युद्ध" करेल', असे ते म्हणाले होते. एक दिवसापूर्वीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनीही अमेरिकेच्या भूमीवरून भारताला थेट अणुबॉम्बच्या हल्ल्याची धमकी दिली आहे.